
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सभेला एक कोटी रुपये खर्च येत आहे. यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. याबाबत शहानिशा करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टिका केली. ते म्हणाले, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. पाकिस्तान, चीनने सीमेवर कुरघोडी चालू केली आहे. सीमेवर अचानक हल्ले केले जातात. अशा परिस्थितीत तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक मोदी यांनी घेतली पाहिजे. त्यांच्याशी चर्चा करून ठोस भूमिका घेऊन उदभवलेल्या परिस्थितीत त्या राष्ट्रांना प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. परंतु, मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात मग्न आहेत. हे चुकीचे असून, मोदींनी पंतप्रधान पदाचे महत्त्व कमी केले आहे. देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री मिळत नसल्याचे खंत व्यक्त करताना पवार म्हणाले, शपथविधी नंतर काही दिवसातच केंद्रीय मंत्रिमंळाचा विस्तार होईल. देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही. अर्थ आणि संरक्षण खाती एकाच व्यक्तीकडे असून, देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री न मिळणे दुर्दैवी आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभा विरोधात राष्ट्रवादी करणार तक्रार
पवार म्हणाले, मी पुणे जिल्ह्यातील आहे. त्यामुळे येथील प्रश्नाची मला पूर्णपणे जाणीव आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी जनतेने उभे राहावे. तसेच विकासासाठी महिलांसाठी सुरक्षित शहर, कल्याणकारी शहर, सर्वोत्तम संगणकप्रणाली, झोपडपट्टीमुक्त शहर आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे, कैशल्यांचा विकास आणि युवाकेंद्री शहर, पर्यावरणपूरक शहर, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न संबोधित करणारं शहर, अद्ययावत जागतिक शहर, सर्वसमावेशक पायाभूत सुविधांचं शहर आणि ऊर्जेन सळसळणारं शहर हा दहा कलमी कार्यक्रम पुणे शहराच्या विकासासाठी राबविला जाणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
