
पुणे – पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मागील दहा दिवसापासून पावसाचा जोर कायम असून मागील दोन दिवसातही पुणे व परिसरात १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणांपैकी असलेले उजनी आणि कोयना धरण १०० टक्के भरली आहेत. तसेच या धरणातून पाणी आता कालव्यात सोडण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वीच पुणे परिसरातील भाटघर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना, मुळशी, खडकवासला आदी धरणे भरली आहेत.
१०० टक्के भरली पश्चिम महाराष्ट्रातील धरणे !
गणेशाचे आगमन होण्याआधीपासून पावसाने राज्यात जोर धरला होता. मराठवाडा, मुंबई, कोकण व पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. सोलापूर व मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, मागील दहा दिवसात जोरदार पाऊस झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जायकवाडी वगळता राज्यातील बहुतेक धरणे ९० ते १०० टक्क्यांपर्यंत भरल्यामुळे आगामी वर्षभर राज्याला दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.
