
पुणे : २६ तास उलटल्यानंतरही आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेतील बचावकार्य अव्याहतपणे सुरू असून ढिगा-यातून आतापर्यंत २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, एनडीआरएफच्या जवानांना ८ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
माळीणमध्ये २६ तासानंतरही बचाव कार्य सुरूच
माळीण गावावर काल सकाळी काळाने घाला घातला अन् काही क्षणात होत्याच नव्हते झाले. डोंगरकडा कोसळून अख्खं गाव मातीच्या ढिगा-याखाली गडप झाल. मातीच्या ढिगाऱयाखाली ४६ घरे दबली गेल्याने १६७ ग्रामस्थ गाडले गेले आहे. ढिगा-यातून काल रात्रीपर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
गुरूवारी सकाळपासून बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, सतत कोसळणारा पाऊस, चिखल यामुळे बचावकार्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपर्यंत बचावकार्याचे फक्त 10 टक्के काम पूर्ण झाले आहे. एनडीआरएफच्या सात पथकांमार्फत जेसीबी व पोकलेनच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे.
