
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास थोडासा महागणार असून एसटीने ही अत्यल्प भाडेवाढ केल्याचे म्हटले आहे. ३१ जुलैपासून ही भाडेवाढे अमंलात येणार आहे.
पुन्हा महागला एसटीचा प्रवास
ही भाडेवाढ साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या ३० किमीच्या प्रवासासाठी लागू असणार नाही. ३१ ते १५० किमीसाठी १ रुपया वाढ करण्यात आली असून शहरी सेवेच्या पहिल्या १६ किमी प्रवासासाठी १ रुपया भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, त्यापुढील प्रवासासाठी ही भाडेवाढ नसल्याचे एसटीने म्हटले आहे.
ही भाडेवाढ सरासरी ०.८१ टक्के एवढी असून त्यामुळे साध्या आणि जलद, तसेच रात्रसेवेमध्ये प्रती सहा किमीसाठी ५ पैस तर निमआराम सेवेत प्रती सहा किमीसाठी १० पैसे अशी वाढ करण्यात आली आहे.
डिझेल दरात सतत होणाऱ्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळास आपल्या प्रवासभाड्यात वाढ करणे भाग पडत असल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.
