मुंबई – केंद्रीय गृह सचिवांकडून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनाही राजीनामा द्या अशा आशयाचा फोन आला असून राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मात्र राजीनामा देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आपल्याकडे राष्ट्रपती राजीनामा मागत नाहीत, तोपर्यंत आपण राजीनामा देणार नाही, असे शंकरनारायणन यांनी सांगितले असल्याचे कळते.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या सात राज्यपालांना केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर धक्का द्यायचे ठरवले असून त्यानुसार या राज्यपालांकडे थेट गुह सचिवांमार्फत राजीनाम्यासाठी निरोप धाडले जात आहेत. त्यात उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामाही दिला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आपल्याकडे राजीनामा मागण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना जोपर्यंत असा राजीनामा मागण्याचा अधिकार असणारी व्यक्ती मला सांगत नाही, तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही, असे शंकरनारायणन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यपालांचा आणखी तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून ७ मे २०१७ पर्यंत ते या पदावर राहू शकणार आहेत.
दरम्यान, के. शंकरनारायणन यांच्याप्रमाणे पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांनीही आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याकडे अद्याप कोणाकडूनही राजीनाम्याची मागणी झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.