भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. स्पर्धेचा पहिला दिवस खूपच रोमांचक होता. दोन्ही संघांच्या गोलंदाजांकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पण भारतीय वेगवान गोलंदाज वेगळ्याच लयीत दिसले. पर्थ कसोटीत टीम इंडियाची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती असून ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात एकाच कसोटीत दोन वेगवान गोलंदाज खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा स्थितीत पहिल्या दिवसाचा खेळही गोलंदाजांच्या नावावर राहिला.
पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचला गेला इतिहास, 72 वर्षांनंतर पाहायला मिळाला हा पराक्रम, भारतीय गोलंदाजांनी केला कहर
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत. अवघ्या 49.4 मध्ये 150 धावा करून संपूर्ण संघ गडगडला. यादरम्यान नितीश कुमार रेड्डी याने पहिली कसोटी खेळताना सर्वाधिक 41 धावा केल्या. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने 37 धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनीही 2-2 विकेट्स घेतल्या.
पण भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियापेक्षा एक पाऊल पुढे होते. 150 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात दिवसअखेरपर्यंत केवळ 67 धावा करता आल्या आणि 7 विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 38 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जसप्रीत बुमराह. कर्णधार जसप्रीत बुमराहने अत्यंत घातक गोलंदाजी करत 10 षटकात केवळ 17 धावा देत 4 फलंदाजांना आपला बळी बनवले. त्याने उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यांच्याशिवाय मोहम्मद सिराजने 2 आणि हर्षित राणाने 1 बळी घेतला.
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी मिळून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 17 फलंदाज बाद झाले. 1952 नंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट पडण्याचा हा विक्रम आहे. याचा अर्थ असा की गोलंदाजांचा असा कहर गेल्या 72 वर्षांत कधीच पाहिला नव्हता. अशा स्थितीत दुसऱ्या दिवसाचा खेळ दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरात लवकर संपवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला आपल्या धावसंख्येमध्ये जास्तीत जास्त धावांची भर घालायची आहे.