दुलीप ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या फेरीला सुरुवात झाली आहे. अनंतपूर येथे भारत ब आणि भारत ड संघांमध्ये सामना होत आहे. इंडिया ड ची कमान स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या हाती आहे. मात्र या स्पर्धेत तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. दुलीप ट्रॉफी ही श्रेयस अय्यरसाठी भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची मोठी संधी होती, परंतु त्याने आतापर्यंत या सर्व संधी गमावल्या आहेत. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे यावेळीही तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही.
श्रेयस अय्यरने वाया घालवली मोठी संधी, चुकीतुन घेतला नाही धडा, नंतर झाली वाईट अवस्था
श्रेयस अय्यरने भारत ब विरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 5 चेंडूंचा सामना केला. या काळात त्याला एकही धाव करता आली नाही आणि तो खातेही न उघडता बाद झाला. दुलीप ट्रॉफीमध्ये ही पहिलीच वेळ नाही, गेल्या सामन्याच्या पहिल्या डावातही श्रेयस अय्यरला खाते उघडता आले नव्हते. त्यावेळी त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती. वास्तविक, तो गडद चष्मा घालून फलंदाजीला आला आणि केवळ 7 चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. फील्डर्स सहसा सनग्लासेस वापरतात. पण फार क्वचितच एखादा फलंदाज हेल्मेटमध्ये गॉगल घालून फलंदाजी करताना दिसला आहे. अशा परिस्थितीत अय्यर आऊट झाल्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.
श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी 2024-25 मध्ये आतापर्यंत 5 डाव खेळले आहेत. या कालावधीत त्याने 20.80 च्या सरासरीने केवळ 104 धावा केल्या आहेत. त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. श्रेयस अय्यरने पहिल्या फेरीच्या सामन्यात 9 धावा आणि 54 धावांची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यात तो खातेही न उघडताच बाद झाला आणि दुसऱ्या डावात त्याने 41 धावा केल्या. त्याचवेळी, आता तो पुन्हा एकदा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा परिस्थितीत त्याचं पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करणे कठीण वाटत आहे.
श्रेयस अय्यरने या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. अलीकडेच त्याची श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय संघात निवड झाली. पण श्रीलंकेतही तो विशेष काही करू शकला नाही. त्याचबरोबर एका अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, सध्या भारतीय कसोटी संघात अय्यरला स्थान नाही. अशा स्थितीत त्याची खराब कामगिरी आता मोठे टेन्शन ठरू शकते.