
मुघल सम्राट अकबराच्या काळात साम्राज्याची व्याप्ती दूरवर पसरली होती. अकबराने केवळ उत्तरेकडेच नव्हे, तर दक्षिणेकडेही आपले अभियन सुरु ठेवले होते. त्यापैकी अहमदनगर काबीज करण्याची मोहीम खूप प्रसिद्ध आहे. येथे राजाला कोणा राजाने नाही, तर राणीने आव्हान दिले होते. त्याकाळी मुलींनी राज्य चालवणे किंवा युद्धात जाणे ही मोठी गोष्ट होती. एका महिलेने मुघलांच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला, तेव्हाची कथा जाणून घेऊया.
ताब्यात घेण्यासाठी आले होते, केला शांतता करार… चांद बीबीने कसा केला मुघलांचा पराभव?
अहमदनगरच्या लढाईत मुघल सैन्याला चोख प्रत्युत्तर देणारी शूर महिला अहमदनगरचा राजा हुसेन निजाम शाह यांची मुलगी राजकुमारी चांद बीबी होती. चांद बीबीचा विवाह विजापूरचा सुलतान अली आदिल शाह पहिला याच्याशी वयाच्या 14 व्या वर्षी झाला होता.
चांद बीबी तिच्या काळात संपूर्ण दख्खनमध्ये खूप प्रसिद्ध राजकुमारी होती. तिच्या रणनीतीचे आणि लढाऊ कौशल्याचे अनेक प्रशंसक होते. ती तिच्या सैन्यातील सर्वोत्तम लढवय्यांशी तासनतास लढत असे. लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत राज्यकारभारात मग्न झाली.
एप्रिल 1579 मध्ये विजापूरचा शासक व चांद बीबीचा पती आदिल शाह याचा खून झाला. आदिल शाहच्या मृत्यूनंतर विजापूरची जबाबदारी चांद बीबीच्या खांद्यावर आली. चांद बीबीला मुलगा नसल्यामुळे आदिल शाहचा 9 वर्षांचा पुतण्या इब्राहिम आदिल शाह याला गादीवर बसवण्यात आले. चांद बीबी बाल सम्राटाची संरक्षक होती आणि राज्याची देखरेख करत होती.
अकबराला दख्खनमध्ये दीर्घकाळ आपले साम्राज्य वाढवायचे होते. पण तो योग्य संधीच्या शोधात होता. चांद बीबी हिच्या पुतण्याने त्यांना ही संधी दिली. वास्तविक चांद बीबीच्या माहेरच्या घरी म्हणजेच अहमदनगरमध्ये तिचा भाऊ निजाम मुर्तझा याने त्याचा मुलगा मीरान हुसैन याला मारण्याचा प्रयत्न केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून मुलानेच वडिलांना मारले. यानंतर मीरान हुसैन गादीवर बसला. सत्तेत आल्यानंतर त्याने ज्यांना आपल्या विरोधात मानले, त्या सर्वांना तुरुंगात टाकले. पण या कारवायांना कंटाळून काही सरदारांनी सत्तापालट करून मीरान हुसैनची हत्या केली. पुढील अनेक वर्षे अहमदनगरमध्ये अनेक कलह आणि अस्थिरता होती. याच संधीचा फायदा घेत दिल्लीच्या सम्राट अकबराने 1595 मध्ये अहमदनगरवर हल्ला केला.
अहमदनगर हे दख्खन प्रदेशात प्रवेश करण्याचे ठिकाण होते. अकबराने त्याचा मुलगा मुराद आणि त्याचा सर्वात सक्षम सेनापती अब्दुर रहीम खान-खाना यांना ताब्यात घेण्यासाठी पाठवले. डिसेंबर 1595 मध्ये तो सुमारे ३० हजार सैनिकांसह अहमदनगरला पोहोचला. हे पाहून अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली. तेथून लोक पळत सुटले आणि मदत मागण्यासाठी विजापूरमधील चांद बीबी हिच्याकडे पोहोचले.
विजापूरच्या राणीने अहमदनगरला कठीण प्रसंगी मदत करण्याचे मान्य केले. तिने ताबडतोब आपला भाऊ मुर्तझा याचा नातू बहादूर निजाम शाह याला तिथला राजा म्हणून घोषित केले. आणि राज्याच्या सुरक्षेसाठी रणनीती बनवायला सुरुवात केली. दुसरीकडे, मुघल सैन्याने एक कट रचला आणि शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
मुरादने सर्वप्रथम चांद बीबीला पत्र पाठवून तिला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण हा त्याच्या कटाचा भाग होता. वास्तविक तो जमिनीखाली बारूद बोगदे खोदत होता. पत्र पाठवून त्याला शत्रूचे लक्ष वळवायचे होते. पण, चांद बीबीच्या नजरेतून हा कट लपला नव्हता. तिला बोगद्यांची माहिती मिळाली आणि तिने त्यांचे मनसुबे उधळून लावले. अकबराच्या मुलाने आणखी हल्ले केले, परंतु सर्व अपयशी ठरले. शेवटी मुघल सैन्याने अहमदनगर काबीज करण्याऐवजी त्यांच्याशी शांतता करार केला.
या शांतता करारावर अकबर अजिबात खूश नव्हता. यावेळी तो स्वतः अहमदनगर जिंकण्यासाठी रणांगणावर आला. 1599 मध्ये, 57 वर्षांचा सम्राट अकबरने अहमदनगरवर हल्ला करण्यासाठी 80 हजार सैनिकांसह दिल्ली सोडली. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, ही बातमी पसरताच राणीचे साथीदार तिला सोडून जाऊ लागले. अशा परिस्थितीत अहमदनगरची राणी एकाकी पडली.
रक्तपात न करता मुघलांशी शांतता प्रस्थापित करण्याची चांद बीबीची योजना होती. पण तिने एक चूक केली. तिने ही गोष्ट राजवाड्यातील नपुंसक हमीद खानला सांगितली. हमीदने अहमदनगरमध्ये त्याचा बिगुल वाजवला. हे ऐकून अहमदनगरचे लोक राणीवर रागावले. याचा काही सैनिकांना इतका राग आला की त्यांनी रात्री राजवाड्यात घुसून चांद बीबीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी चांद बीबीला किल्ल्यातच कुठेतरी पुरण्यात आले.
चांद बीबीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी मुघल सैन्य अहमदनगरला पोहोचले. तोपर्यंत अहमदनगरमध्ये चांद बीबीसारखा रणनीतीकार नव्हता. त्यामुळे या वेळी मुघलांना अहमदनगर जिंकण्यात फारशी अडचण आली नाही.
