
भारतीय क्रिकेट संघ पुन्हा मैदानात उतरण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. यात अजून काही आठवडे बाकी आहेत. चाहतेही संघाच्या घोषणेची वाट पाहत आहेत आणि त्यालाही वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना टीम इंडियाच्या ॲक्शनची उणीव भासत आहे, पण त्यांच्यासाठी भारतीय क्रिकेटमधून सातत्याने बातम्या येत आहेत. अशीच एक मोठी बातमी आता थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या भारतीय संघाच्या तीन सामन्यांच्या वेळापत्रकात बोर्डाने मोठा बदल केला आहे. यातील सर्वात खास भारत-बांगलादेश सामना आहे, जो नवीन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या स्टेडियममधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.
IND vs BAN सामन्याचे ठिकाण बदलले, BCCI चा मोठा निर्णय, ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन
सध्या ब्रेकवर असलेली टीम इंडिया पुढच्या महिन्यापासून म्हणजे सप्टेंबरपासून पुन्हा मैदानात उतरणार आहे. याची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेने होईल, त्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. BCCI ने बांगलादेश संघाच्या या भारत दौऱ्यातील सामन्यात बदल केले आहेत, पण तो कसोटी सामन्याशी संबंधित नसून T20 मालिकेशी संबंधित आहेत. बीसीसीआयने मंगळवारी 13 ऑगस्ट रोजी याची घोषणा केली.
उभय संघांमधील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे, जी 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्याच्या ठिकाणीच मोठा बदल करण्यात आला आहे. आधी हा सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे खेळवला जाणार होता, पण आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे खेळवला जाणार आहे. या बदलाचे कारण धरमशाला स्टेडियमच्या मैदानात होत असलेले बदल सांगण्यात आले आहेत.
🚨 NEWS 🚨
BCCI issues revised schedule for international home season (2024-25).
All the details 🔽 #TeamIndia https://t.co/q67n4o7pfF
— BCCI (@BCCI) August 13, 2024
14 वर्षांतील या शहरातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. यापूर्वी 2010 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर द्विशतक झळकावणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. पण हा सामना या रूपसिंग स्टेडियममध्ये होणार नाही, तर तो ग्वाल्हेरमध्ये बांधलेल्या नवीन श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे, जे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करणार आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया आणि उपाध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. दशकाहून अधिक कालावधीच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या नव्या स्टेडियमचे काम पूर्ण झाल्याने त्यात पहिला सामना रंगणार आहे. महानआर्यमन यांच्या प्रयत्नांनी, मध्य प्रदेशातील सर्वात मोठी T20 क्रिकेट लीग MPL ग्वाल्हेरमध्ये आयोजित करण्यात आली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाहही उद्घाटन कार्यक्रमाला आले होते. याच काळात सिंधिया यांनी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्याची मागणी केली होती.
केवळ हा सामनाच नाही, तर याशिवाय इतर दोन सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. पुढील वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात हे सामने होणार आहेत. इंग्लंडचा संघ जानेवारीत भारत दौऱ्यावर येईल, ज्यामध्ये पहिली 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली आहे. पहिला T20 सामना 22 जानेवारीला चेन्नईत खेळवला जाणार होता, पण आता हा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. 25 जानेवारीला कोलकाता येथे होणारा दुसरा टी-20 आता त्याच तारखेला चेन्नईत खेळवला जाईल. बीसीसीआयने याचे कारण दिले की, प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचा हवाला देत कोलकाता पोलिसांनी या बदलाची मागणी केली होती.
