मुख्य प्रशिक्षक होताच गौतम गंभीरने आपल्या वक्तव्यावरुन मारली पलटी, ज्यांच्यासाठी त्याने 4 वर्षांपूर्वी उठवला होता आवाज, त्यालाच घेतले नाही संघात


27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळवले जातील. या दौऱ्यातून नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही संघाची कमान सांभाळणार आहे. या दोन मालिकांसाठी निवडण्यात आलेल्या संघात अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले आहेत. गौतम गंभीरने एकदिवसीय मालिकेसाठी संघात अशा खेळाडूला स्थान दिले नाही, ज्याला तो एकेकाळी सर्वोत्तम फलंदाज म्हणत होता.

बीसीसीआयने या दोन मालिकेसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची निवड केली आहे. टी-20 संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा असेल. मात्र या दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची संघात निवड झालेली नाही. त्याची अलीकडची कामगिरी चांगलीच झाली आहे, तरीही त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकले नाही. 2020 मध्ये गौतम गंभीरने संजूच्या समर्थनार्थ एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, संजू सॅमसन हा केवळ भारतातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज नाही, तर तो भारतातील सर्वोत्तम युवा फलंदाज देखील आहे. कोणाला वाद घालायचा आहे का? म्हणजेच त्यावेळी त्याने संजूला संघात स्थान देण्यासाठी आवाज उठवला होता, मात्र आता गंभीरने त्याला संघात स्थान दिलेले नाही.


संजू सॅमसनने 2023 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात संजू सॅमसनने 114 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 108 धावांची शतकी खेळी केली. मात्र असे असतानाही त्याला वनडे संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. मात्र, टी-20 मालिकेसाठी संजूची संघात निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही तो T20 संघाचा एक भाग होता, जिथे त्याने मालिकेतील शेवटच्या सामन्यात शानदार खेळी केली होती.

संजू सॅमसनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 16 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 56.66 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 3 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. त्याच वेळी, टी-20 मध्ये त्याने 21.14 च्या सरासरीने 444 धावा केल्या आहेत. त्याने टी-20मध्ये टीम इंडियासाठी 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.