वर्ल्ड चॅम्पियन बनताच हार्दिक पांड्याला मिळाली आणखी एक आनंदाची बातमी


टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. हा खेळाडू जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा T20 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. आयसीसीने बुधवारी नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पांड्याने क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेत मोहम्मद नबी आणि वानेंदू हसरंगा याना मागे ढकलले आहे. पांड्या याआधी तिसऱ्या स्थानावर होता आणि T20 विश्वचषकात त्याच्या चमकदार कामगिरीनंतर तो नंबर 1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे.

T20 विश्वचषकात केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. या खेळाडूने 8 सामन्यात 48 च्या सरासरीने 144 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही दीडशेहून अधिक होता. या काळात त्याच्या बॅटमधून अर्धशतकही झळकले. याशिवाय गोलंदाजीत त्याने 8 सामन्यात 11 बळी घेतले. अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने 3 षटकात फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले. मोठी गोष्ट म्हणजे या खेळाडूने टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरला बाद केले.

हार्दिक पांड्यासाठी टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी करणे इतके सोपे नव्हते. आयपीएल 2024 मध्ये या खेळाडूची कामगिरी खूपच खराब होती. तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आणि संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही. इतकेच नाही तर जवळपास प्रत्येक सामन्यात त्याला स्टेडियममध्ये ट्रोल करण्यात आले, त्याच्याविरोधात जोरदार टीकाही झाली. पण पांड्याने या सगळ्यावर मात करत टी-20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करून टीकाकारांची बोलती बंद केली.

टी-20 विश्वचषकानंतर आता हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार बनू शकतो. रोहित शर्मा निवृत्त झाला आहे आणि आता पांड्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी येणार आहे, कारण हा खेळाडू उपकर्णधार होता आणि त्याने अनेक प्रसंगी संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर पांड्याने असेही म्हटले होते की, विश्वविजेता बनण्याची ही फक्त सुरुवात आहे, त्याला अजून पाच ट्रॉफी जिंकायच्या आहेत.