राजस्थानमध्ये एका पतीने पत्नीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर पत्नीने आपले अपहरण झाले नसल्याचे सांगितले. तर, ज्या व्यक्तीविरुद्ध तिच्या पतीने गुन्हा दाखल केला होता, ती त्याच्यासोबत स्वेच्छेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. त्यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, हा कायदेशीर गुन्हा नाही.
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा दोन प्रौढांचे विवाहबाह्य संमतीने संबंध असतील, तर तो कायदेशीर गुन्हा नाही. राजस्थान उच्च न्यायालयाने पतीने दाखल केलेली याचिका फेटाळताना सांगितले की, व्यभिचार हा आयपीसीच्या कलम 497 अंतर्गत अपवाद आहे, जो आधीच रद्द करण्यात आला आहे. न्यायमूर्ती बिरेंद्र कुमार म्हणाले की, आयपीसी कलम 494 (बिगामी) अंतर्गत खटला तयार केला जात नाही, कारण दोघांपैकी कोणीही जोडीदाराच्या हयातीत दुसरे लग्न केले नाही. जोपर्यंत विवाह सिद्ध होत नाही, तोपर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपसारखे नाते कलम 494 अंतर्गत येत नाही.
वास्तविक, अर्जदाराने आपल्या पत्नीचे एका व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याची पत्नी प्रतिज्ञापत्रासह न्यायालयात हजर झाली. तेथे तिने सांगितले की, तिचे कोणीही अपहरण केले नाही, परंतु ती आरोपी संजीवसोबत तिच्या स्वेच्छेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. यावर न्यायालयाने म्हटले की, आयपीसीच्या कलम 366 अंतर्गत कोणताही गुन्हा केलेला नाही आणि एफआयआर रद्द करण्यात आला.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, महिलेने कबूल केले की तिचे संजीवसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे तो आयपीसीच्या कलम 494 आणि 497 अंतर्गत गुन्हा ठरतो. सामाजिक नैतिकतेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राचा वापर करण्याचे आवाहन वकिलाने केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत एकल खंडपीठाने म्हटले की, आपल्या समाजातील मुख्य प्रवाहात शारीरिक संबंध हे केवळ विवाहित जोडप्यांमध्येच असावेत, हे खरे आहे, परंतु जेव्हा दोन प्रौढ व्यक्ती विवाहबाह्य सहमतीने संबंध ठेवत असतील, तर तो गुन्हा नाही.
विरुद्ध लिंगाच्या दोन प्रौढ व्यक्तींमध्ये (व्यभिचाराचा अपवाद वगळता) सहमतीने लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तथापि, हे अनैतिक मानले जाते. न्यायालयाने म्हटले आहे की, एखादी प्रौढ महिला तिच्या इच्छेशी लग्न करू शकते आणि तिला वाटेल त्याच्यासोबत राहू शकते. खंडपीठाने म्हटले, अर्जदाराच्या पत्नीने एका आरोपीसह संयुक्त जबाब नोंदविला आहे की तिने स्वतःच्या इच्छेने घर सोडले आणि संजीव सोबत नात्यात आहे.