आपले आरोग्य चांगले कसे राखाल..


आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही ठराविक नियमांचे पालन कधीही फायद्याचेच ठरते. उदाहरणार्थ आहार आणि व्यायामातील नियामितपणा, तसेच झोपेच्या किंवा कामाच्या नियमित सवयी ह्या सर्वच गोष्टींनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण ह्यामधील काही सवयींचा जर अतिरेक झाला तर तो मात्र आपल्याला नुकसानकारक ठरू शकतो. उदाहरणार्थ वजन कमी करण्यासाठी जर डायट पाळायचे झाले तर डायट प्रमाणे आपले खानपान सांभाळणे चांगले. पण वजन जलद घटविण्याच्या मोहापायी डायटिंग चा अतिरेक करून शरीराला आवश्यक तेवढे अन्न ही न मिळू देणे हे मात्र हानिकारक ठरू शकते. ह्या अतिरेकाच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये अशक्तपणा तर येईलच, पण उतरविलेले वजन फार काळापर्यंत लांब राहू शकणार नाही. जेव्हा आहार पूर्ववत होईल तेव्हा वजनही वाढायला लागेल. त्यामुळे आपले आरोग्य सांभाळायच्या दृष्टीने काही गोष्टींचा अतिरेक टाळायला हवा.

काही व्यक्ती आपल्या वजनाची सतत काळजी करत असतात. वजन घटविण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी मनामध्ये एक ठराविक लक्ष्य असणे ठीक आहे पण त्याकरिता दररोज वजन काट्यावर उभे राहून वजनाची चिंता करत बसणे मात्र वाईट. आपण आपल्या आहाराची काळजी घेतली आणि सोबत नियमित व्यायामाची जोड मिळाली तर आपल्या मनातील लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल. मात्र त्यासाठी वेळेचा निर्बन्ध मात्र घालू नये.

सर्वच व्यायामप्रकार सर्वच व्यक्तींना आवडतील किंवा करायला जमतील असे नाही. आपल्या मित्र – मैत्रिणी कुठला तरी ठराविक व्यायाम करतात म्हणून आपणही तेच करायला हवे असे नाही. काहींना चालणे आवडते, काहींना पळणे, काहींना सायकलिंग तर काहींना पोहोणे आवडते. आपल्याला जो व्यायामप्रकार आवडत असेल, ज्या मुळे आपल्याला शारीरिक स्वास्थ्याबरोबरच आनंदही मिळत असेल असा व्यायामप्रकार निवडावा. अश्या प्रकारे हा व्यायाम आपोआपच नियमित केला जाईल, आणि त्या मुळे आरोग्यही चांगले राहील. त्याचबरोबर आपल्या शरीराची ठेवण आपल्याला आवडत नाही म्हणून व्यायाम करायचा ही भावना मनात असू नये. व्यायामामुळे शरीर सुडौल होण्यास मदत मिळेलच, शिवाय, व्यायामामुळे आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, त्यामुळे आपल्या एनर्जी लेव्हल्स चांगल्या राहिल्या पाहिजेत हे ओळखून व्यायाम करायला हवा.

व्यायामच्या जोडीने सांभाळायचा असतो तो म्हणजे आपला आहार. आपण खाणार असलेले अन्न आपल्या आवडीचे असेल तर त्यातून आपल्याला आनंद मिळतो. अन्न किती प्रमाणात खाल्ले पाहिजे किंवा कसे खाल्ले पाहिजे किंवा कुठल्या वेळेला खाल्ले पाहिजे याचे नियम पळणे आवश्यक आहे. पण म्हणून या नियमांचा अतिरेक करीत अन्नपासून शरीराला वंचित ठेवणे हे ही चुकीचे आहे. आपल्याला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू माफक प्रमाणात खाल्ल्या गेल्या तर त्या अपायकारक नाहीत. मात्र जर एखाद्या व्याधीमुळे आपल्या आहारावर डॉक्टरांनी काही निर्बंध घातले असतील तर ते मात्र काटेकोरपणे पाळायला हवेत. काही लोकांना आपण खात असलेल्या प्रत्येक पदार्थामधील कॅलरीज मोजत बसण्याची सवय असते.

शरीरासाठी ठराविक कॅलरीज आवश्यक असतात आणि त्याबद्दल काटेकोर राहणे हे ठीक आहे, पण कधी कॅलरीज जास्त घेतल्या गेल्यामुळे अस्वस्थ होऊन न जाता त्या कॅलरीज आपल्या व्यायामाद्वारे कश्या वापरल्या जातील याचा विचार करावा. अशा प्रकारे योग्य आहाराला योग्य व्यायामची जोड मिळाली की चांगल्या आरोग्याचे लक्ष्य नक्कीच पूर्ण होऊ शकेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment