टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा मोठ्या वादात सापडला आहे. जडेजाच्या वडिलांनी एका मुलाखतीत मुलगा आणि सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांमध्ये कोणतीही चर्चा होत नसून, ते बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांनी केला आहे. एवढेच नाही, तर वडिलांनी रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिच्यावरही आरोप केले आहेत. आता याप्रकरणी जडेजाने मौन तोडले असून हे आरोप चुकीचे आणि एकतर्फी असल्याचे वक्तव्य केले आहे.
रवींद्रचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी एका गुजराती वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपला मुलगा आणि सुनेवर खळबळजनक आरोप केले आहेत. 2016 मध्ये रिवाबासोबत लग्न झाल्यानंतर त्यांचा मुलगा पूर्णपणे बदलला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी रवींद्रची पत्नी रिवाबा हिच्यावर आरोप केला की लग्नाच्या 2-3 महिन्यांनंतर तिने सर्व संपत्ती तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. रवींद्र आणि त्याची पत्नी कुटुंबापासून वेगळे राहतात आणि त्यांच्याशी बोलतही नसल्याचे त्यांनी सांगितले.
Let's ignore what's said in scripted interviews 🙏 pic.twitter.com/y3LtW7ZbiC
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) February 9, 2024
ही मुलाखत समोर आल्यापासून खळबळ उडाली असून आता जडेजाने याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. वडिलांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या जडेजाने गुजरातीमध्ये आपले वक्तव्य जारी केले आणि मुलाखतीला ‘स्क्रिप्टेड’ म्हटले आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. आपल्या निवेदनात जडेजाने लिहिले की, वृत्तपत्रातील अलीकडील लेख मूर्खपणाचा आणि खोटा, पूर्णपणे एकतर्फी आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडूने पुढे लिहिले की त्यात सांगितलेल्या गोष्टी योग्य नाहीत आणि तो त्याच्याशी सहमत नाही.
रिवाबावरील आरोपांमुळे जडेजा आणखी नाराज झाला आणि म्हणाला की हा आपल्या पत्नीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे, ज्याचा तो निषेध करतो. यानंतर जडेजाने ताकीद दिली की, तोही सार्वजनिकपणे बरेच काही बोलू शकतो, पण तसे करणे टाळतो.
रवींद्र जडेजाचे वडील चौकीदार होते आणि त्यांनी आपल्या मुलाला गरिबीत वाढवले आणि त्याला क्रिकेटर बनवले. रवींद्र जडेजा लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. अशा परिस्थितीत त्याच्या दोन मोठ्या बहिणींनी मिळून त्याला मोठे केले आणि त्याचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. आता वडिलांचा आरोप आहे की तो आणि त्याच्या दोन मुली एका फ्लॅटमध्ये राहतात, तर जडेजा आणि त्याची पत्नी त्यांच्यापासून वेगळ्या घरात राहतात. रवींद्र आपल्या वडिलांशी आणि बहिणींशी बोलत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे आणि आता रवींद्रला क्रिकेटर बनवून रिवाबासोबत लग्न केल्याचा त्यांना पश्चाताप होत आहे.