एक मंदिर जेथे प्रसादाऐवजी अर्पण केली जातात घड्याळे, जाणून घ्या त्याची रंजक कहाणी


मंदिरात जाण्यापूर्वी लोक देवाला अर्पण म्हणून फळे, फुले, हार, मिठाई इत्यादी वस्तू खरेदी करतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर लोक आनंदी होतात आणि मंदिरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करतात. तुम्ही आजपर्यंत मंदिरात दिल्या जाणाऱ्या अनेक प्रसादाबद्दल ऐकले असेल, पण आम्ही तुम्हाला अशा मंदिराविषयी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण भारतात असे एक मंदिर आहे जिथे लाडू किंवा इतर प्रसाद नाही, तर घड्याळे अर्पण केले जातात. येथे जाऊन घड्याळ अर्पण केल्यास कोणत्याही प्रकारचा अपघात आणि वाईट वेळ टळू शकते, असे सांगितले जाते. याविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊया.

हे मंदिर उत्तर प्रदेशातील जौनपूर जवळील एका गावात आहे. हे मंदिर ब्रह्माबाबा म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे येणारा प्रत्येक भाविक फुलांच्या हारांऐवजी मंदिरात घड्याळे अर्पण करतो. या मंदिराची ही परंपरा सुमारे 30 वर्षे जुनी आहे. या अनोख्या प्रसादामुळे हे मंदिर लोकांमध्ये चर्चेचे केंद्र राहिले आहे. ब्रह्माबाबा किंवा घडी बाबांच्या या अनोख्या मंदिरामागे एक परंपरा आहे.

स्थानिक लोकांच्या मते, एकदा एक व्यक्ती चांगला ड्रायव्हर बनण्याच्या इच्छेने ब्रह्माबाबा मंदिरात आला होता. बाबांच्या मंदिरात केलेली त्याची इच्छा पूर्ण झाली आणि तो चांगला ड्रायव्हर झाला. आनंदी होऊन त्या व्यक्तीने या मंदिरात घड्याळ अर्पण केले होते. या मंदिरात मनोकामना पूर्ण होतात, हे समजल्यावर लोकांनी मंदिरात नैवेद्य म्हणून घड्याळे द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत हे परंपरेप्रमाणे चालत आले आहे.

घडी बाबांचे हे मंदिर इतके लोकप्रिय आहे की त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर लोक दूरदूरवरून येथे नैवेद्य दाखवण्यासाठी येतात. या मंदिराच्या बाहेर एक वटवृक्ष आहे, जिथे लोक घड्याळ अर्पण करतात. या मंदिराची आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरात प्रसाद म्हणून दिलेली घड्याळे कोणीही चोरू शकत नाही. या मंदिरात वर्षभर भाविक येत असतात.