IND vs SA : केएल राहुलचे हे विधान ट्रोल्सच्या तोंडावर आहे चपराक, शतक झळकावल्यानंतर भारतीय फलंदाजाने सांगितली मन की बात


भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या. केएल राहुलच्या शतकाने संघाला ही धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने 101 धावांची खेळी केली. राहुलची ही खेळी अशा वेळी आली, जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. या शतकासह राहुलने सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राहुलने सामन्यानंतर सांगितले की, मला माझ्या बॅटने उत्तर देणे आवडते.

राहुलला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. काही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला, तर लोक त्याला प्रचंड ट्रोल करतात. राहुलला मात्र याचा त्रास झालेला नाही. तो कठोर परिश्रम करतो आणि आपल्या बॅटने धावा करून टीकाकारांना उत्तर देतो.

दुसऱ्या दिवशी, बुधवारचा सामना संपल्यानंतर जेव्हा राहुलला विचारण्यात आले की, लोक सोशल मीडियावर त्याला ट्रोल करतात, तेव्हा त्याला राग येत नाही का? त्यावर राहुलने उत्तर दिले की, यातून मला काहीही मिळणार नाही. लोकांना जे म्हणायचे आहे, ते म्हणतील असे राहुल म्हणाले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने सांगितले की, जर तुम्ही पब्लिक परफॉर्मर असाल, तर तुम्हाला तुमच्या कामगिरीने उत्तर द्यावे लागेल, तरच तुम्ही टीका टाळू शकता. तुम्ही सोशल मीडियापासून जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल, असे राहुल म्हणाले.

137 चेंडूत 14 चौकार आणि चार षटकारांसह राहुलची ही लढाऊ खेळी भारतासाठी खूप उपयुक्त ठरली.या खेळीच्या जोरावर भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांनी झळकावलेल्या 10 सर्वोत्तम शतकांमध्ये या खेळीचा समावेश केला आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलला याबाबत विचारण्यात आले असता, तो म्हणाला की, गावस्कर असे बोलले असतील, तर ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. दुखापतीमुळे मिळालेल्या वेळेमुळे त्याला स्वतःवर काम करण्यास मदत झाल्याचे राहुलने सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला केवळ एक खेळाडू म्हणून आव्हानांचा सामना करावा लागत नाही, तर एक व्यक्तिमत्त्व म्हणूनही तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.