
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी म्हणजेच आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या नजरा मालिका जिंकण्यावर असतील. भारताने पहिला सामना अगदी सहज जिंकला होता. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी दाखवली आणि यजमान संघ अवघ्या 116 धावांत गारद झाला. आता केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला, तर मालिका टीम इंडियाच्या नावावर होईल. पण यात अडचण येऊ शकते. त्यामुळे भारताची मालिका जिंकण्याची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण पाऊस असू शकतो.
IND vs SA : पोर्ट एलिझाबेथमध्ये भारताच्या पदरी पडणार निराशा, होऊ शकणार नाही सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र, उरलेल्या दोन सामन्यांमध्ये पावसाचा तडाखा बसला नाही आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. पहिल्या वनडेतही पावसामुळे कोणतीही अडचण आली नाही. मात्र, दुसऱ्या वनडेबाबत हवामानाची चिंता आहे.
दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट एलिझाबेथ येथे खेळवला जाणार आहे. यावेळी येथील वातावरण पावसाळी असते. Accuweather च्या अहवालानुसार, दिवसभरात 25 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. 37 टक्के ढगाळ वातावरण राहील. मात्र, हा फारसा चिंतेचा विषय नाही. एकच चिंता आहे की पूर्ण 50 षटकांचा सामना शक्य होईल का? दिवसभर पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत सकाळी पाऊस झाल्यास सामना सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे सामन्यातील षटकेही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीम इंडिया आणि चाहत्यांना मात्र पाऊस पडणार नाही आणि सामना 50 षटकांचा राहील अशी आशा असेल.
हा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी हा सामना जिंकलाच पाहिजे अन्यथा यजमान संघ मालिका गमावेल. पहिल्या सामन्यात संघ अतिशय खराब खेळला आणि त्यामुळेच त्यांना सामना गमवावा लागला. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली हा संघ दुसऱ्या सामन्यात आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.
