गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा तिसरा T20 सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. टीम इंडियाच्या नजरा हा सामना जिंकण्यासोबत मालिका विजयावर होत्या. या सामन्यातील विजयामुळे भारताला मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळाली असती. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. मालिका जिंकण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या सामन्यात भारतीय संघ विजयाचा झेंडा फडकवेल, असे वाटत होते, पण हा सामना हरला. शेवटच्या तीन षटकांमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेडने टीम इंडियाकडून विजय हिसकावून घेतला आणि ऑस्ट्रेलियाला या मालिकेत कायम ठेवले.
या सामन्यात वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 3 गडी गमावून 222 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावत नाबाद 123 धावा केल्या. पण गायकवाडच्या शतकावर ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाची सावली पडली. मॅक्सवेलने नाबाद 104 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.
टीम इंडिया मॅच जिंकेल असे वाटत होते. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 18 चेंडूंमध्ये म्हणजेच तीन षटकांत विजयासाठी 49 धावांची गरज होती. या धावा पुरेशा होत्या, पण भारतीय गोलंदाजांना या धावा वाचवता आल्या नाहीत आणि टीम इंडियाला सामना गमवावा लागला. 18 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी केली. या षटकात सहा धावा आल्या. मात्र या षटकात सूर्यकुमारकडून वेडचा महत्त्वाचा झेल सुटला. हा झेल खूपच अवघड होता, तरी तो पकडला असता, तर सामना भारताच्या ताब्यात येऊ शकला असता. सूर्यकुमार यादवने 19 वे षटक अक्षर पटेलला दिले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेडने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरही चौकार आला. चौथा चेंडू नो बॉल होता, कारण इशान किशनने चेंडू स्टंम्पच्या आधी पकडला. त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट ठरला. या चेंडूवर वेडने षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर एक धाव आली. शेवटच्या चेंडूवर इशान किशनने चेंडू सोडला आणि ऑस्ट्रेलियाला चार धावा मिळाल्या.
अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 21 धावांची गरज होती. सूर्यकुमारने प्रसिद्ध कृष्णाकडे चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर वेडने चौकार मारला. पुढच्या चेंडूवर एक धाव आली. मॅक्सवेलने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने आणखी एक चौकार मारला आणि यासह त्याने आपले शतक पूर्ण केले. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती आणि या चेंडूवर चौकार मारून मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने आपल्या खेळीत आठ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. कर्णधार वेडने 16 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे टीम इंडिया आणि त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. या सामन्यातील विजयाने भारताने मालिका जिंकली असती. पण ऑस्ट्रेलियाने हे होऊ दिले नाही. आता भारताला 1 डिसेंबरला रायपूर येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेत विजय मिळवण्यासाठी चौथ्या टी-20 सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. येथे ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.