अहमदाबादमध्ये भरणार VIP ची जत्रा, उतरणार 100 जेट विमाने, पाहुण्यांच्या यादीत ही मोठी नावे


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील आणि जगभरातील 100 हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी होणार आहेत. सामन्याच्या दिवशी अहमदाबाद विमानतळावर सुमारे 100 चार्टर्ड विमाने उतरण्याची शक्यता आहे. अंतिम सामना संस्मरणीय करण्यासाठी बीसीसीआयकडूनही विशेष तयारी करण्यात आली आहे.

क्रिकेट विश्वचषक पाहण्यासाठी आलेल्या 100 हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या यादीत पंतप्रधान आणि अनेक केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि माजी न्यायमूर्ती आणि 8 हून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. परदेशी पाहुण्यांबाबत सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळही अहमदाबादला पोहोचणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी सिंगापूर, अमेरिका आणि यूएईचे राजदूतही स्टेडियममध्ये दिसणार आहेत.

उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानीही आपल्या कुटुंबासह सामना पाहण्यासाठी येणार आहेत. त्याचवेळी लक्ष्मी मित्तलही आपल्या कुटुंबासह स्टेडियममध्ये अंतिम सामन्याचा आनंद घेताना दिसणार आहेत. आता बॉलीवूडबद्दल बोलायचे झाले, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे अनेक सिनेस्टार देखील साक्षीदार होणार आहेत. RBI गव्हर्नरही स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेताना दिसणार आहेत.

भारतातून उपस्थित राहणारे काही व्हीव्हीआयपी पाहुणे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
  • केंद्रीय गृहराज्यमंत्री
  • केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर
  • केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
  • आसाम, मेघालयसह 8 राज्यांचे मुख्यमंत्री
  • उदयनिधी स्टॅलिन, तामिळनाडू सरकारचे मंत्री
  • RBI गव्हर्नर
  • नीता अंबानी (परिवारासह)
  • उद्योगपती लक्ष्मी मित्तल (कुटुंबासह)
  • अनेक बॉलिवूड कलाकार

परदेशातून आलेले व्हीव्हीआयपी पाहुणे

  • ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान
  • ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ
  • सिंगापूर, यूएस, यूएईचे राजदूत

इतर व्हीव्हीआयपी पाहुणे

  • सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि माजी न्यायमूर्ती
  • गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
  • इतर राज्यांच्या न्यायालयांचे न्यायाधीश

खरेतर, भारतीय क्रिकेट संघाने 15 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. भारताकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक पूर्ण केले. दुसरीकडे, श्रेयस अय्यरनेही 70 चेंडूत 105 धावांची स्फोटक खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 327 धावांवर गडगडला.

त्याच वेळी, गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकांत 3 विकेट्स राखून सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने 8व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 101 धावांची खेळी केली, तर ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 62 धावा केल्या.