World Cup 2023 : रणतुंगाच्या वक्तव्यामुळे झुकले श्रीलंका सरकार, मागितली जय शाह यांची माफी


विश्वचषक-2023 मधील श्रीलंका संघाच्या फ्लॉप शोनंतर माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याबाबत वक्तव्य केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता. याच वक्तव्याबद्दल श्रीलंका सरकारने जय शाह यांची माफी मागितली आहे. आज (शुक्रवार) संसदेत बोलताना मंत्री हरिन फर्नांडो आणि कांचना विजेसेकेरा यांनी या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला आणि दोष श्रीलंकेच्या प्रशासकांचा आहे, इतर कोणत्याही देशाचा नाही.

मंत्री विजेसेकेरा म्हणाले, सरकार म्हणून आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांच्याकडे खेद व्यक्त करतो. आमच्या संस्थांच्या उणिवांसाठी आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे सचिव किंवा इतर देशांना दोष देऊ शकत नाही. हा गैरसमज आहे. दरम्यान, पर्यटन मंत्री हरिन फर्नांडो यांनी सांगितले की, अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेटवरील आयसीसीच्या बंदीबाबत चर्चा करण्यासाठी जय शाह यांच्याशी संपर्क साधला आहे.

हरिन फर्नांडो म्हणाले की, आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर घातलेली बंदी देशासाठी चांगली नाही. या बंदीचा परिणाम पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकावर होणार आहे. ते पुढे म्हणाले की जर आयसीसीची बंदी उठली नाही, तर या स्पर्धेसाठी कोणीही श्रीलंकेला जाणार नाही. श्रीलंकेला क्रिकेट स्पर्धेतून एक पैसाही मिळणार नाही.

श्रीलंकेचा विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याने जय शाह यांच्यावर श्रीलंकेचे क्रिकेट बर्बाद केल्याचा आरोप केला होता. रणतुंगा यांनी आरोप केला की, श्रीलंका क्रिकेट अधिकारी आणि जय शाह यांच्यात साखळी आहे आणि बीसीसीआयला विश्वास आहे की ते एसएलसीच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात.

माजी कर्णधार म्हणाला, श्रीलंका क्रिकेट अधिकारी आणि जय शाह यांच्यातील संबंधांमुळे बीसीसीआयला असा समज आहे की ते एसएलसीला काढून टाकू शकतात आणि नियंत्रित करू शकतात. जय शाह हे श्रीलंकन ​​क्रिकेट चालवत आहेत. जय शाहच्या दबावामुळे श्रीलंकेचे क्रिकेट बर्बाद होत आहे.