आशिया चषकात खेळणारेच खेळाडू विश्वचषकात खेळणार? अजित आगरकरचे मोठे वक्तव्य


आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आव्हान सादर करेल. आशिया चषकासाठी हार्दिक पांड्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, पण या वर्षी भारताला एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकासाठी आशिया चषक संघ सारखाच असेल की त्यात काही बदल होणार आहे. त्याची चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने पत्रकार परिषदेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आगरकरने टीम इंडियाच्या 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. केएल राहुलचा बॅकअप म्हणून संजू सॅमसनला ठेवण्यात आले आहे. विश्वचषक संघाबाबत आगरकर म्हणाला की, भारतीय संघ या 17 खेळाडूंच्या आसपास असेल. वास्तविक, टीम इंडियाला विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची निवड करायची आहे. आशिया चषक स्पर्धेत सर्व काही व्यवस्थित राहिल्यास आणि सर्व खेळाडू तंदुरुस्त राहिल्यास आशिया चषक संघातील 15 खेळाडू भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी मैदानात उतरतील.


मुख्य निवडकर्त्याने सांगितले की विश्वचषकाची निवड 5 सप्टेंबर रोजी आहे. तिलक वर्माच्या विश्वचषकातील संधींबाबत आगरकर म्हणाला की, आशिया कप ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे. जर त्याने विश्वचषक संघात स्थान मिळवले, तर तो आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार नाही. तिलकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण वेस्ट इंडिज दौऱ्यावर केले, जिथे त्याने सर्वाधिक धावा केल्या. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. अशा स्थितीत आशिया कप ही त्याच्यासाठी संधी आहे.

दुसरीकडे रोहित शर्माने विश्वचषक संघाबाबत सांगितले की, दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत. म्हणजेच आशिया चषकासाठी ज्यांना संघात स्थान मिळू शकले नाही, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. तो म्हणाला की, आर अश्विन, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर यांनाही विश्वचषक संघात स्थान मिळवण्याची संधी आहे.