Maharashtra Political Crisis : तीन ‘गुप्त बैठका’ आणि बदलले संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय समीकरण


महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य घडले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्ष बदलून एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्रीही असतील.

रविवारी राजभवनात घाईगडबडीत शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह नऊ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून 40 आमदारांसह पक्ष फोडल्याचा दावा केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण गेम अत्यंत गुप्त पद्धतीने रचण्यात आला होता. शरद पवार पुण्यात होते, तर मुंबईत हे सारे राजकीय चक्र तयार होत होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठका सुरूच होत्या. राज्यात तीन राजकीय पक्षांच्या बैठका सुरू होत्या, पण त्याचा सुगावाही कुणाला लागला नाही.

या तीन ‘गुप्त बैठकीं’ने महाराष्ट्राचे संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकले. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह राजभवनात पोहोचल्याचे अचानक समजले. त्यानंतर कळले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथे उपस्थित आहेत. काही वेळातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अशात अजित पवारांनी काका शरद पवारांना मोठा धक्का देत राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मोठी राजकीय खेळी केली.

अजितच्या मागण्यांवर 6 जुलैला निर्णय घेणार – पवार
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता शरद पवारांकडे एकूण 14 आमदार उरले आहेत. पुण्यात शरद पवार यांनी अजित पवारांच्या मागण्यांवर 6 जुलैला निर्णय घेऊ असे म्हटले आहे. या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश भरत तपासे यांनी या शपथविधी सोहळ्याला पक्षाकडून कोणतीही मान्यता देण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि बैठकही घेतली असे सांगितले जात आहे.

डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन झाले आहे – सीएम शिंदे
शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आता आपल्याकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. अजित पवारांचा अनुभव महाराष्ट्राला बळकट करण्यास मदत करेल.