दुसऱ्या T20 मध्ये अर्शदीपने टाकले पाच नो बॉल, रचला हा लाजिरवाणा विक्रम


श्रीलंकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले. आता तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा आणि निर्णायक सामना शनिवारी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खळेवला जाणार आहे. दुसऱ्या T20 मध्ये श्रीलंकेने भारतासमोर 207 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलंदाजांवर जोरदार मुसंडी मारली. गेल्या सामन्यात न खेळलेल्या अर्शदीप सिंगला या सामन्यात संधी देण्यात आली. मात्र, त्याने दोन षटकांत 18.50 च्या इकॉनॉमीमध्ये 37 धावा दिल्या. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला गोलंदाजी दिली नाही. अर्शदीपने दोन षटकांत पाच नो बॉल टाकले.

यासह त्याने एक लाजिरवाणा विक्रमही केला. अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक नो बॉल करणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपला पदार्पण होऊन एक वर्षही झाले नाही आणि त्याने हा लाजिरवाणा विक्रम केला आहे. अर्शदीपने आतापर्यंत 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यात 14 नो बॉल टाकले आहेत. यापूर्वी हा विक्रम तीन गोलंदाजांच्या नावावर होता. यामध्ये पाकिस्तानचा हसन अली, वेस्ट इंडिजचा कीमो पॉल आणि ओशाने थॉमस यांचा समावेश आहे. तिघांनीही 11-11 नो बॉल टाकले आहेत.

अर्शदीप श्रीलंकेच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने या षटकात तीन नो बॉल टाकले. या षटकातून 19 धावा आल्या आणि श्रीलंकेला गती मिळाली. यानंतर अर्शदीप १9व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि या षटकात दोन नो बॉल टाकले. 19व्या षटकात 18 धावा झाल्या. अशा स्थितीत श्रीलंकेचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.

या सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही अर्शदीपवर टीका केली. ते म्हणाले – एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही हे करू शकत नाही. आजच्या खेळाडूंना गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत असे आपण अनेकदा ऐकतो. नो बॉल न टाकणे तुमच्या हातात आहे. तुम्ही गोलंदाजी केल्यानंतर काय होते, फलंदाज काय करतो हा वेगळा मुद्दा आहे. नो बॉल न टाकणे नक्कीच तुमच्या नियंत्रणात आहे.

त्याचवेळी, सामना संपल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यानेही अर्शदीपबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सामन्यानंतरच्या सादरीकरणात हार्दिक म्हणाला – पराभवाचे कारण गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही होते. पॉवरप्लेने आम्हाला दुखावले. आम्ही मूलभूत चुका केल्या ज्या आम्ही या टप्प्यावर करू नयेत. शिकणे हे मूलभूत गोष्टींबद्दल असले पाहिजे, ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. तुमचा दिवस वाईट असू शकतो, परंतु मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. या परिस्थितीत हे खूप कठीण आहे. याआधीही अर्शदीपने नो-बॉल टाकला होता. हे दोष देण्याबद्दल नाही तर नो बॉलचा गुन्हा आहे.

अर्शदीपशिवाय भारताच्या इतर वेगवान गोलंदाजांची कामगिरीही खराब होती. शिवम मावीने चार षटकांत 53 धावा देऊन विकेट्स घेतल्या नाहीत तर उमरान मलिकने चार षटकांत 48 धावा देऊन तीन बळी घेतले. श्रीलंकेने 20 षटकांत 6 बाद 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 190 धावाच करू शकला.