टाटा समूहात नवीन ४५ हजार नोकऱ्या

दक्षिण भारतात इलेक्ट्रोनिक फॅक्टरी मध्ये ४५००० महिलांना रोजगार देण्याची योजना टाटा समूहाने आखली असून १८ ते २४ महिन्यात हे लक्ष्य गाठले जाणार आहे. या कारखान्यात आयफोन कंपोनंट तयार केले जातात. सध्या येथे १० हजार कामगार असून त्यातील बहुसंख्य महिला आहेत. अमेरिकन अॅपल इंकशी नुकत्याच झालेल्या करारानुसार टाटा समूह येथे ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून तमिळनाडू सरकारने टाटाला ५००एकर जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. सध्याच्या कारखान्यात आयफोनचे केसिंग तयार केले जाते.

अॅपल, चीन बाहेर अन्य देशात आयफोनचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत असून टाटा अश्या कंपन्या मध्ये सामील आहे. तमिळनाडू कारखान्यात सप्टेंबर मध्ये ५ हजार महिलांना नोकरी दिली गेली असून त्यांना महिना १६ हजार पगार दिला जात आहे. शिवाय राहणे आणि जेवणखाण सुविधा दिली गेली आहे. टाटा येथे प्रशिक्षण योजना सुद्धा राबविणार आहे.

अॅपल प्रमाणेच अन्य कंपन्या सुद्धा चीन मधून त्यांचा व्यवसाय कमी करून अन्य देशात नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोविड १९ लॉकडाऊन मुळे पुरवठा साखळीवर फार वाईट परिणाम झाला आहे. शिवाय चीन अमेरिकेमधील वाढता तणाव हे आणखी एक कारण आहे. परिणामी या कंपन्या चीन बाहेर भारत, फिलिपिन्स मध्ये जात आहेत. भारतात आयफोन उत्पादनासाठी विस्ट्रोन आणि टाटा ग्रुप संयुक्त प्रकल्प योजनेवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. भारतात सध्या फॉक्सकॉन, पेगाट्रोप, विस्ट्रॉन कॉर्प मध्ये आयफोन उत्पादन होत आहे.