नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुरादाबादमधील नमाज वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला आहे. मुस्लिमांशी अशी वागणूक किती दिवस देणार आहात, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना घेरले आहे. ओवेसी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भारतातील मुस्लिम आता घरीही नमाज अदा करू शकत नाहीत? आता नमाज अदा करण्यासाठी सरकार/पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल का? याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावे, देशातील मुस्लिमांना दुसऱ्या दर्जाचे म्हणून कधीपर्यंत वागवले जाणार?
ओवेसींनी पुढे लिहिले आहे की, समाजात कट्टरतावाद इतका पसरला आहे की आता इतरांच्या घरी नमाज अदा केल्यानेही लोकांच्या भावना दुखावल्या जातात.
भारत में मुसलमान अब घरों में भी नमाज़ नहीं पढ़ सकते? क्या अब नमाज़ पढ़ने के लिए भी हुकूमत/पुलिस से इजाज़त लेनी होगी? @narendramodi को इसका जवाब देना चाहिए, कब तक मुल्क में मुसलमानों के साथ दूसरे दर्जे के शहरी का सुलूक किया जाएगा?
1/2 https://t.co/mwOK6tKZWb— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 28, 2022
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील छजलैत पोलीस स्टेशन हद्दीतील दुल्हापूर गावात लोकांनी नमाज अदा केल्याने दुसऱ्या गावात द्वेष, वैर आणि वैमनस्य पसरवले जात असल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली आहे. सामूहिक नमाज अदा केल्याप्रकरणी पोलिसांनी 16 नामांकित आणि 10 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी नमाज अदा करणाऱ्यांविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गावात एकही मशीद किंवा मदरसा नाही, त्यामुळे घरात नमाज अदा केली जाते, असे सांगितले जात आहे. नमाज अदा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.