भारताचा झिम्बाब्वेवर 10 विकेट्सनी विजय, शिखर धवन आणि शुभमन गिल यांची नाबाद अर्धशतके


हरारे – भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने एकही विकेट न गमावता लक्ष्याचा पाठलाग केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

शिखर धवन आणि शुभमन गिलच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला. 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 30.5 षटकात 192 धावा करत सामना जिंकला. भारताकडून शिखर धवनने नाबाद 81 आणि शुभमन गिलने 62 धावा केल्या. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी याच मैदानावर खेळवला जाणार आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने चांगली सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या, पण पहिला विकेट पडताच संपूर्ण संघ कोलमडला. झिम्बाब्वेचे चार फलंदाज 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर सिकंदर रझा आणि कर्णधार चकाबवा यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 35 धावा जोडल्या, पण प्रसिद्ध कृष्णाने रझाला बाद करून ही भागीदारी तोडली.

110 धावांवर झिम्बाब्वेने आठ विकेट गमावल्या होत्या, परंतु यानंतर इव्हान्स आणि नागरवा यांच्यातील शानदार 70 धावांची भागीदारी केली आणि झिम्बाब्वेचा संघ अखेरीस 189 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताची सलामी जोडी शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी करत 192 धावांची सलामी भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला.