मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप, म्हणाले- गेल्या काही दिवसांत घेण्यात आले मनमानी निर्णय


मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांच्या सरकारने सत्तेत आल्याच्या पहिल्या 40 दिवसांत 750 निर्णय घेतले. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत मनमानी पद्धतीने आदेश जारी केले, असे म्हणत शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला की ठाकरे जूनच्या अखेरीस पायउतार झाल्यानंतरही मागील सरकारने काही आदेश जारी केले होते. त्या निर्णयांचा फेरविचार का केला जात नाही, असा सवाल शिंदे यांनी केला. आमचे सरकार तळागाळात काम करते, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्ष आणि त्यांचे पूर्वसुरी ठाकरे यांचाही समाचार घेतला.

उपमुख्यमंत्र्यांनीही केले आहेत आरोप
यापूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत 400 सरकारी आदेश जारी केले आणि अर्थसंकल्पीय वाटपाच्या पाचपट वाटप केले. तत्कालीन सत्ताधारी आघाडी महाविकास आघाडी (एमव्हीए) बंडखोरीनंतर अल्पमतात आल्यावर हे सरकारी आदेश जारी करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. हे आदेश मुख्यत्वे विविध विकास-संबंधित कामांसाठी निधी वाटपाशी संबंधित आहेत. यासोबतच शिवसेना आणि त्रिपक्षीय सरकारच्या वैधतेवरही शंका आल्याचा आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी केला होता.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 30 जून रोजी घेतली शपथ
खरं तर, 21 जून रोजी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांच्या एका गटाने बंड केले. त्यानंतर 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. शिंदे आणि फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली. 30 जून रोजी शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेत आहेत.