या देशांतून भारतीय कामगारांना मोठी मागणी

परराष्ट्र मंत्रालयाकडे असलेल्या रोजगार आकडेवारीनुसार परदेशी जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या गेल्या तीन वर्षात दुपटीपेक्षा जास्त झाली असून ही संख्या ९४ हजार वरून १ लाख ९० हजारावर गेली आहे. यात जगभरातील १८ देशात काम करणाऱ्या भारतीय कामगारांचा समावेश आहे. या देशात जाण्यासाठी भारतीय कामगारांना इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड पासपोर्ट घ्यावा लागतो.

ईसीआर (इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड) पासपोर्ट म्हणजे ज्याचे शिक्षण १० वी पर्यंत सुद्धा झालेले नाही त्यांना विशेष शिक्का असलेला पासपोर्ट दिला जातो. या श्रेणी मध्ये प्लंबर, इलेक्ट्रिशियन वा तत्सम कौशल्ये असलेले कामगार या पोर्टलच्या माध्यमातून काम करण्यासाठी परदेशी जाण्याची परवानगी मिळवू शकतात. करोना काळात सुद्धा या देशांतून भारतीय कामगारांना मागणी होती. पण या वर्षी जून अखेरची आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, जून २०२२ अखेर या पासपोर्टवर सर्वाधिक कामगार उत्तर प्रदेशातून गेले असून त्यांची संख्या ६७२४० इतकी आहे.

आज पर्यंत या विशेष पासपोर्टवर परदेशात कामासाठी जाणाऱ्यात केरळचे कामगार मोठ्या संखेने असत पण यंदा यांची संख्या घटली आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहार, प.बंगाल, राजस्थान, तामिळनाडू मधून सर्वाधिक कर्मचारी परदेशात गेले आहेत.