नवी दिल्ली : दहशतवाद्यांशी कसे वागले पाहिजे, हे भारताने अमेरिकेकडून शिकले पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) म्हटले आहे. तपासाच्या नावाखाली दहशतवाद्यांना वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवण्याऐवजी त्यांना अल-जवाहिरीप्रमाणे तात्काळ ठार मारण्याचे धोरण स्वीकारावे, असे संघटनेने म्हटले आहे. पीएफआयच्या कारवाया पाहता, त्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. PFI देशातील मुस्लिम वर्गाला धर्माच्या नावावर भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. उशीर झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात.
‘हर हर शंभो’ या गाण्याच्या गायिका फरमाणी नाझ या केवळ भजने गाण्याचे काम करतात, मात्र त्यासाठी त्यांना फतवा जारी करुन घाबरवण्याचेही काम केले जात आहे, असे विहिंपचे सह सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. इस्लामिक दहशतवाद्यांना केवळ त्यांच्या अटींवर देश चालवायचा आहे, हे या घटनेने सिद्ध होते. ते ‘सर तन से जुडो का’च्या भीतीदायक घोषणा वारंवार देत आहेत, पण आता देशाने संघटित होऊन त्याचा विरोध केला पाहिजे.
सुरेंद्र जैन म्हणाले की, काही लोकांना धर्मांधतेच्या आगीत देशाला पुन्हा 1946 सारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. देशात श्रीलंकेसारखी स्थिती असल्याचे आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचे वारंवार सांगितले जात आहे. अर्थव्यवस्थेच्या नावाखाली देशातील एका वर्गाला भडकवण्याचा हा डाव आहे. यावर त्वरित बंदी घालण्यात यावी.