रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आठव्यांदा शून्यावर आऊट


रात्री उशिरा सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला आणि तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यासोबतच रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे.

रोहित शर्मा हा भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही 8 वी वेळ होती. या यादीत रोहित शर्मानंतर केएल राहुलचा नंबर येतो. केएल राहुल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खाते न उघडता चार वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

मात्र, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची नावे आणखी एका खास यादीत येतात. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी 4 शतके झळकावली आहेत. या प्रकरणात केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

भारतचा पराभव
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. भारताचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 138 धावा करून ऑलआऊट झाला. या सामन्यात भारताकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य 19.2 षटकांत 5 विकेट्स गमावून अगदी सहज गाठले.

मात्र, तरीही भारताला मालिकेत पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे. दोन्ही देशांमधला तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्टला होणार आहे. मात्र, भारतीय वेळेनुसार आता तिसरा टी-20 सामना रात्री 8 ऐवजी रात्री 9.30 वाजता सुरू होईल.