इलेक्ट्रिक कार्स करणार आवाज

इलेक्ट्रिक कार्स चे मुख्य आकर्षण पेट्रोल डीझेलची गरज नाही आणि ही वाहने प्रदूषण करत नाहीत तसाच या वाहनांचा अजिबात आवाज होत नाही. म्हणजे ही वाहने सायलेंट आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही. पण भारतात मात्र इलेक्ट्रिक कार्स संदर्भातले नियम थोडे बदलले जाणार असून या वाहनांनी आवाज केला पाहिजे असा नवा नियम येऊ शकतो.

भारताप्रमाणेच जगभरात ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यामागे ग्राहकात जागरुकता वाढली आहे आणि त्यामुळे कस्टमर बेस सुद्धा वाढला आहे असे चित्र आहे. परिणामी आता केवळ दिग्गज ऑटो कंपन्याच नव्हे तर अगदी स्टार्टअप सुद्धा ऑटो क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहन अजिबात आवाज करत नाही पण भारत सरकारने मात्र इलेक्ट्रिक वाहन सायलेंट असण्याची गरज नाही असा विचार केला आहे.

या संदर्भात ऑटो इंडस्ट्री स्टँडर्ड कमिशनने सरकारकडे नॉर्म संदर्भात एक प्रस्ताव दिला आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहनांनी आवाज केला पाहिजे जेणेकरून पादचारी आणि अन्य वाहनांना अॅलर्ट मिळू शकेल असे म्हटले आहे. इलेक्ट्रिक दुचाकी यासाठी हा नॉर्म असावा अशी अपेक्षा नाही मात्र चार चाकी इलेक्ट्रिक वाहनासाठी मात्र आवाज हवा असा नॉर्म लवकरच येऊ शकेल असे समजते.