मोदींसोबत खरी शिवसेना, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या वक्तव्याने उडाली राजकीय खळबळ


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला पूर्णपणे काबीज करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही शिवसेनेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाच्या भवितव्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत तिच खरी शिवसेना असल्याचे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे पक्षाला वाचवू शकतील, अशी शक्यता कमी असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे कमी संख्याबळ
रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. ज्याच्याकडे बहुमत आहे, तोच खरा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांची संख्या कमी असल्याने भविष्यात शिवसेनेचे नेतृत्वही एकनाथ शिंदे यांच्याकडेच असेल, असे ते म्हणाले. याशिवाय ठाकरे पुन्हा पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील, अशी शक्यताही कमी आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोदी
रामदास आठवले म्हणाले की, सत्ता परिवर्तनानंतर राज्याला मजबूत सरकार मिळाले आहे. त्यामुळे आता विकासकामांनाही गती मिळणार असून सर्वसामान्यांना सुविधांसोबत न्याय मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्याने विकासकामांबरोबरच जनतेच्या अपेक्षाही पूर्ण होत असल्याचे आठवले म्हणाले. याशिवाय आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आता कोणत्याही कामात अडथळा येण्याची शक्यता नाही.

उद्धव ठाकरे यांची मुलाखत
विरोधकांवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांची तब्येत बिघडली होती, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. त्याच वेळी, काही लोक होते, जे उलट कट रचण्यात व्यस्त होते. विरोधकांना शिवसेना आणि ठाकरे कुटुंब वेगळे करायचे आहे, असे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. शिवसेनाप्रमुखपदावरही त्यांची वक्रदृष्टी आहे.

बंडखोरांना बाळासाहेबांची जागा घ्यायची आहे, ते त्यांच्याशी स्वतःची तुलना करत आहेत. हिंदुत्वाबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उद्धव म्हणाले. आमच्या घरी हिंदुत्वाचा आशीर्वाद आहे. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, ते (भाजप) नितीशकुमार यांच्यासोबत बसले आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत का?