Maharashtra Crisis : बंडखोर आमदारांशी बोलू अथवा आव्हान देऊ नका… भास्कर जाधवांचा राऊतांना सल्ला


मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. असे असतानाही शिवसेना आपल्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्याऐवजी त्यांच्यावरच हल्लाबोल करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षनेते संजय राऊत यांना बंडखोर आमदारांना ‘आव्हान’ देण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे.

चिपळूणचे आमदार जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना बंडखोरांशी संवाद साधा, त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत का, याचा शोध घ्या. संवादातून मतभेद मिटवता येतात. खरे तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या छावणीत सहभागी न झालेल्या काही आमदारांपैकी जाधव हे एक आहेत. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी सरकारविरोधात बंड केले. शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह आसाममध्ये तळ ठोकला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. तिकडे शिंदे यांनी जवळपास 45 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना त्यांचे मन वळविण्याऐवजी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.

एकनाथ शिंदे यांचे मुंबईत आगमन येतील हा दावा फुसका
गुवाहाटीतील ज्या हॉटेलमध्ये बंडखोर मुक्कामी आहेत, तिथून एकनाथ शिंदे मुंबईला निघाल्याची बातमी आली. त्यामुळे मुंबईतील राजकीय हालचाली वाढल्या, पण शिंदे मुंबईत आले नाहीत. शिंदे यांनी मुंबईला येण्याचा आपला बेत पुढे ढकलला आहे, सध्या ते गुवाहाटीतच राहणार असल्याचे सांगण्यात आले. आम्हाला धमक्या दिल्या जात असल्याचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. येथे शिवसेनेचे 38 आमदार आणि 12 अपक्ष आमदार आहेत.

चांदिवलीतील शिवसेनेच्या आमदारानेही केली बंडखोरी
चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, ज्यांना उद्धव ठाकरेंसोबत वारंवार पाहिले जात होते तेही शुक्रवारी गुवाहाटीला रवाना झाले. तेथे बंडखोर आमदारांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेनेने सुरू केलेल्या घटनात्मक प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून शिंदे गटातील 37 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा सचिव यांना पाठवण्यात आले आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे, तर मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड केली आहे.

शरद पवार यांची भेट घेताच कठोर भूमिकेत दिसले संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी बंडखोरांविरुद्ध कठोर भूमिका दाखवली. ते म्हणाले की, आम्हाला जे करायचे होते, ते आम्ही केले आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. बंडखोरांशी चर्चा करण्याची आणि त्यांच्या परतण्याची वेळ संपली आहे. राऊत पुढे म्हणाले की, जर फ्लोअर टेस्ट झाली, तर आम्ही जिंकू. लढाई रस्त्यावर झाली, तर तिथेही जिंकू. ज्याला सामोरे जायचे आहे त्यांनी मुंबईत यावे. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अनिल देसाई उपस्थित होते.