रेल्वे प्रवासात मिळणार ‘सात्विक थाळी’, इस्कॉनबरोबर झाला करार

कांदा लसूण न खाणाऱ्या तसेच पूर्ण शाकाहारी भोजन घेणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासात आता सात्विक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन आरसीटीसी (रेल्वे केटरिंग, टुरिझम कार्पोरेशन)ने इस्कॉन मंदिराच्या गोविंदा रेस्टॉरंट बरोबर सहकार्य करार केला आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन पासून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर सुरु केली जाणार आहे.

रेल्वेचा प्रवास अधिक अंतराचा असेल तर शुध्द शाकाहारी प्रवाशांना भोजनाची अडचण येते. त्यातही कांदा लसूण न खाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पँट्री किंवा अन्य ई केटरिंग सेवा यातून उपलब्ध होणार्या पदार्थांच्या शुद्धतेबद्दल खात्री वाटत नाही. आरसीटीसी ने देशातील विविध भागात किफायती दरात टूर पॅकेज देणारी ‘ देखो अपना देश’ योजना सुरु केली आहे. या माध्यमातून देशातील विविध धार्मिक स्थळांची यात्रा करता येते. या प्रवासात सात्विक थाळी प्रवाशांची मोठीच सुविधा ठरेल असे रेल्वे अधिकारी सांगतात.

या सेवेमध्ये डिलक्स, महाराजा थाळी, पुरानी दिल्ली व्हेज बिर्याणी, नुडल्स, दाल माखनी, पनीर सह अन्य अनेक पर्याय आहेत. थाळी साठी प्रवाशांना प्रवास सुरु होण्याअगोदर दोन तास ऑर्डर द्यावी लागेल. प्रवाशांना पीएनआर नंबरसह बसल्या जागीच थाळी मिळणार आहे असे रेल्वेने जाहीर केले आहे.