नवी दिल्ली : दिल्लीतील त्यागराज स्टेडियम रात्री लवकर रिकामे करून तिथे कुत्र्याला फिरवण्याच्या वादात अडकलेल्या आयएएस रिंकू दुग्गा आणि त्यांचे पती आयएएस संजीव खिरवार यांच्या बदलीचा वाद चांगलाच तापला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोईत्रा यांनी याला अरुणाचलचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
आयएएस संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांनी दिल्ली त्यागराजा स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याबद्दल मीडिया रिपोर्टच्या काही तासांनंतर, गृह मंत्रालयाने गुरुवारी दोघांवर कारवाई केली. मंत्रालयाने एजीएमयूटी कॅडरचे दोन्ही आयएएस अधिकारी संजीव खिरवार आणि रिंकू दुग्गा यांची बदली केली आहे. खिरवार यांची दिल्लीहून लडाखमध्ये तर दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे. खासदार मोइत्रा यांनी ट्विट केले की, आयएएस रिंकू दुग्गा आणि खिरवार यांची ईशान्येकडील राज्यांमध्ये बदली करून, गृह मंत्रालयाने सांगितले आहे की ही राज्ये आपल्या नजरेत ‘कचरा फेकण्याचे मैदान’ आहेत.
सीएम खांडू आणि केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी करावा विरोध
मोईत्रा यांनी अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना टॅग केले आणि गृहमंत्रालयाच्या या निर्णयाला विरोध करण्यास सांगितले. एका निरंकुश नोकरशहाची दिल्लीतून अरुणाचल प्रदेशात बदली होणे ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे लोकसभा खासदार म्हणाल्या. तृणमूल खासदार म्हणाले की, या अधिकाऱ्यांच्या ईशान्येकडील बदल्यांमुळे हे स्पष्ट झाले आहे की, केंद्रीय गृहमंत्रालय ईशान्येबद्दल केवळ शाब्दिक प्रेम दाखवते.
लडाख हे शिक्षेचे ठिकाण का: ओमर अब्दुल्ला
त्याच वेळी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, लोक लडाखला दंडात्मक पोस्टिंग का म्हणत आहेत? अनेकांसाठी ते एक सुंदर ठिकाण आहे. लडाखच्या लोकांसाठी हे निराशाजनक आहे की त्यांना शिक्षा देण्यासाठी अधिकारी पाठवले जातात.
दोघे एकमेकांपासून 3500 किमी राहतील दूर
आयएएस दाम्पत्य आतापर्यंत दिल्लीत एकत्र काम करत होते, मात्र आता त्यांना एकमेकांपासून 3500 किलोमीटर अंतरावर राहावे लागणार आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हे जोडपे त्यांच्या कुत्र्यासोबत स्टेडियममध्ये फिरताना दिसत होते.
हे आहे संपूर्ण प्रकरण
दिल्लीतील त्यागराज स्टेडियममधील खेळाडू आणि प्रशिक्षक काही काळ नाराज झाले होते, कारण त्यांना स्टेडियम रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते, जेणेकरून आयएएस अधिकाऱ्याचे कुत्रे तिथे फिरू शकतील. हीच बातमी गुरुवारी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर त्याचे पडसाद उमटू लागले. यावर दिल्ली सरकारही कडक झाले. दिल्ली सरकारने एक आदेश जारी करत म्हटले आहे की, आता दिल्लीतील प्रत्येक स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत सरावासाठी खुले असेल. यानंतर IAS खिरवार म्हणाले होते, मी कधीही खेळाडूला स्टेडियम सोडण्यास सांगणार नाही. स्टेडियम बंद झाल्यावर मी जातो… आम्ही त्याला (कुत्र्याला) ट्रॅकवर सोडत नाही. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर मी ते थांबवतो.