नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल फायनलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (29 मे) होणारा अंतिम सामना साडेसात वाजता सुरू होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रात्री आठ वाजल्यापासून विजेतेपदाचा सामना सुरू होऊ शकतो. समारोप समारंभ लक्षात घेऊन बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकते.
फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप सोहळा होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता समारोप सोहळा सुरू होणार आहे. हे किमान 50 मिनिटे सुरु राहिल. अशा स्थितीत नाणेफेक साडेसात वाजता होणार आहे. 30 मिनिटांनंतर सामना सुरू होईल.
पुढील वर्षी होऊ शकतो मोठा बदल
बोर्ड पुढील हंगामापासून आयपीएल सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा असताना ही बातमी समोर आली आहे. पुढील वर्षीपासून दुपारचे सामने आता दुपारी 3 ऐवजी 4 वाजता सुरू होतील. त्याच वेळी, संध्याकाळी 7:30 वाजता सामना रात्री 8 वाजता सुरू होऊ शकतो. पहिल्या 10 सीझनमध्ये (2008-17) सुरू होणाऱ्या सामन्याची ही वेळ होती.
आयपीएलच्या पहिल्या दशकात उद्घाटन आणि समारोप समारंभात बॉलीवूड स्टार्स दिसले. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या (CoA) नियमानुसार ते तीन वर्षांसाठी बंद होते. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत मंडळाने त्याचे पालन केले. आता पुन्हा एकदा आयपीएलच्या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स पाहायला मिळणार आहेत.
यावर्षीही 26 मार्चला झालेल्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा झाला नाही. समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय नंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (22 मे) साखळी फेरीतील 70 सामने पूर्ण होतील. यानंतर अहमदाबाद आणि कोलकाता येथे प्लेऑफचे आयोजन करण्यात येणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने 24 आणि 25 मे रोजी कोलकातामध्ये खेळवले जातील. त्यानंतर 27 आणि 29 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर-2 आणि फायनल होईल.