शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश


मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक अधांतरी असताना निवडणूक सज्जतेवर शिवसेनेने भर दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना या वेळापत्रकाची वाट न पाहता निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत़

जाहीर सभेतून आता शिवसेना मैदानात उतरत असल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला गती दिली. राज्यातील जनतेपर्यंत महाविकास आघाडी सरकारची विकास कामे पोहोचवण्याची आणि त्यातूनच पक्ष संघटना बळकट करण्याची मोहीम शिवसेनेने हाती घेतली आहे.

उद्धव ठाकरे आजारपणामुळे सध्या घरातच असतात, अशी चर्चा घडवत त्यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या आक्रमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची खेळी भाजपने खेळली होती. जिल्ह्याजिल्ह्यांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे मनोबल खच्ची करण्याची रणनीतीही त्यात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्यामुळे आणि शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांमुळे शिवसैनिकांमध्येही अस्वस्थता होती. त्यामुळेच शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात जाहीर सभेद्वारे ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत शिवसेना आक्रमक पवित्रा घेत असल्याचा संदेश दिला. त्याआधी उद्धव ठाकरेंनी खासदारांची व पक्ष प्रवक्त्यांची बैठक घेत स्थानिक विकास कामांना महत्त्व देताना विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा आदेश दिला होता.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे. उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुखांची बैठकही घेतली. जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन तेथील पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घ्या, प्रशासनाशी, नेत्यांशी समन्वय साधून त्यांना गती द्या. लोकांच्या समस्या सरकारच्या माध्यमातून कशा सोडवता येतील, यासाठी पाठपुरावा करा, शिवसंपर्क अभियानातून आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, निवडणुका कधी होणार याची चिंता न करता आता थेट तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला.

शिवसेना महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करा, असा संदेशही त्यांनी दिला. एकापाठोपाठ एक बैठका घेत संघटनात्मक कामांमध्ये व निवडणुकीच्या तयारीत लक्ष घालत असल्याचा आणि युद्धपातळीवर निवडणूक तयारी सुरू केल्याचा अप्रत्यक्ष संदेश यातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला जात आहे.

सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. राज्यात अशा परिस्थितीतही उद्योग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण तरुणांना रोजगार मिळवून देत आहोत. हृदयात राम आणि हाताला काम देणे असे आपले हिंदूत्व आहे. ही आपली हिंदूत्वाची व्याख्या जनतेपर्यंत पोहोचायलाच हवी, शिवसेना जे करेल ते आपल्या हिताचेच असेल हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.