उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणतात, हा आमचा मास्टरब्लास्टर डोस असेल; हिंदुजननायक कोण?, महानायक कोण? अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल


मुख्यमंत्री – आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे कोणावर आजच्या सभेत निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्याच्या विविध भागातून शिवसैनिक या सभेला उपस्थित राहण्यासाठी येणार आहेत. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सभेबद्दल माध्यमांना माहिती दिली. आजची सभा ही क्रांतीकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तर या सभेतून मिळतील. असे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा ही सभा बाप आहे. मुंबईत कोरोनाच्या काळानंतर एवढ्या मोठ्या सभा झालेल्या नाहीत. विराट, अतिवराट अशी शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अशाप्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील. जर आजच्या सभेचे व्यासपीठ आपण पाहाल, तर आतापर्यंत एवढे मोठे व्यासपीठ हे मुंबईत कधीच निर्माण झालेले नव्हते. अशाप्रकारचे हे भव्य व्यासपीठ आहे. शिवसेनेचा संपूर्ण कारभार भव्य असतो. आज मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच, महाराष्ट्रातील, मुंबईतील आमचे हजारो, लाखो शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाची मागील दोन-अडीच वर्षांपासून वाट पाहत होते. उद्धव ठाकरे यांनी अनेक ठिकाणी मागील दोन वर्षांत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला होता. बैठका घेतल्या पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. आजच्या सभेने खासकरून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने महाराष्ट्रातील, देशातील राजकीय वातावरण आणि या वातावरणावर आलेला एक मळभ, धुके, गढूळपणा हे पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचे आकाश निरभ्र होईल. फक्त येथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशात तुम्हाला दिसेल, असे संजय राऊत म्हणाले.

तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे चाललेला आहे. हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असे वाटते आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असेही संजय राऊतांनी बोलून दाखवले.

संजय राऊत भाजपच्या बुस्टर डोस सभेवरून निशाणा साधताना म्हणाले, बुस्टर डोस कोणाचा मला माहीत नाही. हा आमचा मास्टरब्लास्टर डोस असेल, आमची फटकेबाजी असते. आम्ही मास्टरब्लास्टर आहोत. शिवसेना व गर्दी यांचे एक नाते आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमावावी लागत नाही. आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हिंदुत्वाचा विचार आहे. आमचा मराठी माणसासंदर्भातील विचार आहे. महाराष्ट्रच्या स्वाभिमानासंदर्भातील विचार आहे, विकासासंदर्भातील विचार आहे. यामुळे शिवसेनेचे एक लोहचुंबक आहे विचारांचे, लोक आपोआप जमतात. खासकरून आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक उत्सुकता ही महाराष्ट्र आणि देशाला आहे. आज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशाप्रकारची ही सभा आहे.

त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट होते, आहेत आणि राहतील. बाकी आम्ही सगळे हिंदुंचे संघटन करत आहोत आणि त्यांना लढण्याची प्ररेणा देत आहोत. हिंदुजननायक कोण?, महानायक कोण? हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट आणि लोकांच्या हृदयात त्यांचे स्थान राहील, असे देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवले.