देशात आलेले सर्व हिंदु-मुस्लिम पूर्वी बौद्ध होते; रामदास आठवलेंचे वक्तव्य


देवळाली – रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे आयोजित सभेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी सर्व बौद्ध होते. नंतर देशात हिंदू धर्म घेऊन लोक हिंदू झाले. हिंदू-मुस्लिम असा तेढ निर्माण करू नका. देशातील मुसलमानही बाहेरून आलेले नाहीत. तेही आधी हिंदू आणि तत्पूर्वी बौद्ध होते, असा दावा केला आहे.

संविधानाच्या आधारे देशाचा कारभार चालतो. त्यामुळे कोणी भोंगे काढण्याची, भोंगे वाजविण्याची वक्तव्य करून समाजात दरी निर्माण करण्याचा तसेच धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. गौतम बुद्धांचा भगवा रंग आहे. बुद्ध आणि भगवा रंग शांततेचे प्रतिक आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत राज ठाकरे हे तयार झालेले असल्यामुळे वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको, असा सल्ला आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

उत्तर प्रदेशमधून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यास विरोध होत आहे. राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या एका खासदाराने केली आहे. यासंदर्भात आठवले यांनी राज यांच्या अयोध्या जाण्याला विरोध नाही, पण उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, असे सूचित केले. आठवले यांनी भोंग्याच्या मुद्यावरून त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत. शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पक्ष असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंतच राहू, असे त्यांनी सांगितले.