नाना पटोलेंच्या खंजीर खुपसल्याच्या विधानावरून अजित पवारांनी लगावला टोला!


मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यापासून भाजपकडून ते कधी पडेल याचे मुहूर्त वारंवार सांगितले जात आहेत. याचदरम्यान अनेकदा या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे दावे देखील केले जातात. यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद सभापती निवडणुकांदरम्यान चव्हाट्यावर आला. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोलेंना शेलक्या शब्दांत सुनावतानाच त्यांच्या वक्तव्यावर टीका देखील केली आहे.

मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

अजित पवारांना आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोलेंच्या टीकेवर तोंडसुख घेतले आहे. एक वक्तव्य काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केले की राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. वास्तविक नानांचे ते वक्तव्य मला तर फार हास्यास्पद वाटते. कारण मागे कुठल्या पक्षातून नानाच काँग्रेसमध्ये आले, ते तुम्हाला माहिती आहे. ते भाजपमध्ये होते. मग आता भाजपने म्हणायचे का? पाठीत खंजीर खुपसून ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरते हेडलाईन मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसणे वगैरे वक्तव्य कदाचित त्यांना बरे वाटत असेल, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, काही तालुक्यात, जिल्ह्यात भाजपसोबत काँग्रेसने देखील संधान बांधले असल्याचा खळबळजनक दावा अजित पवार यांनी केला. संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस काम करत आहे. मागेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करायचे. पण राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेत असतात.

अनेकदा वेगळ्या घटना जिल्ह्यात घडत असतात. वातावरण योग्य राहण्यासाठी आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय असला, तर हे प्रश्न निर्माण होत नाही. काही तालुक्यात, जिल्ह्यात काँग्रेसने देखील भाजपसोबत संधान बांधले आहे. मी त्याला फार महत्व देऊ इच्छित नाही. पण जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ निघून वेगळा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दांत अजित पवारांनी नाना पटोलेंना सुनावले आहे. पूर्वी नाना पटोले काँग्रेसमध्ये होते, तिथून ते भाजपमध्ये गेले आणि भाजप सोडून ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आले. कशाला बोलायचे. झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

आपापला पक्ष वाढवण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अधिकार आहे. आत्ताच्या परिस्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरच बहुमताचा 145 हा आकडा गाठता येतो आणि याची नोंद सर्वांनीच घ्यावी. त्याबद्दल राज्य स्तरावर आमची शरद पवारांनी बैठक घेतली होती. त्यात आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची असल्याचे त्यांनी सांगितले. पण जिल्हा स्तरावर वेगळे प्रश्न असतील, तर स्थानिक नेते -पदाधिकाऱ्यांना काही प्रमाणात मुभा देण्यात आली असल्याचे म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंना सूचक इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनीही त्यांच्याकडे घेतले आहेत. आम्ही दोघांनी मिळून 1999 ते 2014 अशी 15 वर्ष आघाडीचे सरकार चालवले. त्या काळातही काही जिल्ह्यात आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढवायचो. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचो. जर एखादी व्यक्ती राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असेल, इतर ठिकाणी जाऊन विरोधी पक्षाची ताकद वाढणार असेल, तर त्यापेक्षा आमच्या मित्रपक्षांकडे गेली, तर त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. आपली आघाडी एकजूट राहिली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.