मनसे प्रमुख राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे. उर्दू शब्दांचा वापर धमकीच्या पत्रामध्ये करण्यात आल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बाळा नांदगावकर यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली, याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचे कारण उघड केले आणि राज ठाकरेंना धमकी मिळाल्याची माहिती दिली.

मला एक धमकीचे पत्र मिळाले आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवले आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू, असे पत्रात लिहिल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे पत्र हिंदीत असून त्यात उर्दू शब्दांचाही वापर करण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पत्र कोणी दिले याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आले आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला, तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी. भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे, असे बाळा नांदगावकर म्हणाले.