उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या उंदरांना अयोध्येत कधीच घुसू देऊ नका; भाजप खासदाराचे वक्तव्य


नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशात त्यांना रोखण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आधीच उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यातच नंदिनी येथे साधुसंत आणि नागरिकांसोबत बैठकीचे आयोजन आता त्यांनी केले असून यावेळी काय निर्णय घेतला जातो याची उत्सुकता आहे. दरम्यान त्यांनी एबीपी माझाशी बोलताना पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

अचानक आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण राज्यात करू लागलेले राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पण भाजपचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या दौऱ्यापूर्वीच स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामधील भाजप नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले, तरी उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे. त्यातच मंगळवारी बृजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशात मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे.

उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्यांना कधीच येथे घुसू देणार नाही. मला मंत्री, नेता व्हायचे नाही आहे. मला द्यायचे तेवढे देवाने, पक्षाने आणि जनतेने दिले आहे. उत्तर भारतीयांवर जर पुन्हा हात उचलला, तर आम्ही शांत बसणार नाही, महाराष्ट्रात थेट पोहोचू. आता ते दिवस संपले आहेत, जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण केल्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना संरक्षण देत होते. त्यांना आता सुरक्षा मिळणार नाही. कोणतीही व्यक्ती धर्मविरोधी, देश तोडणारे वक्तव्य करत असेल तर पोलिसांनी त्यांची सुरक्षा हटवली पाहिजे, असे बृजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे दबंग नाही, तर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझे म्हणणे ऐकले नाही आणि माफी मागितली नाही, तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात परत कधीच येऊ शकणार नाहीत. मला मराठ्यांचे समर्थन असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत असल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरेंना विरोध आहे, पण मराठ्यांना नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा, अशी बृजभूषण सिंह यांची मागणी आहे.