उत्तर भारतीयांचा अपमान करणारा कोणीही ‘माई का लाल’ जन्माला आलेला नाही, असे म्हणत राज ठाकरेंना महंतांचा इशारा


लखनौ – देशातील राजकारणाचा पारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून चांगलाच चढला आहे. आधी उत्तर भारतीयांना मराठीच्या मुद्द्यांवर लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी भूमिका बदलत हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. पण, त्यांच्या जुन्या भूमिका आजही त्यांच्या हिंदुत्वाच्या नव्या राजकारणाला आव्हान देताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वात राज ठाकरे यांच्या 5 जुनच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध होत असताना उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.

सभेत उपस्थित महंत म्हणाले, धर्मदंड माझ्या हातात आहे. राज ठाकरे यांना हे सांगायला आम्ही आलो आहोत की याआधी त्यांनी उत्तर भारतीयांचा जो अपमान केला आहे, त्यासाठी त्यांनी माफी मागावी. राज ठाकरे यांनी माफी मागितली, तर त्यांचे स्वागत होईल. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना छटी का दुध याद दिलाएंगे. तसेच उत्तर भारतीयांचा अपमान करणारा कोणीही ‘माई का लाल’ अद्याप जन्माला आलेला नाही.

जर राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर त्यांचे स्वागत वेगळ्या पद्धतीने केले जाईल. त्यासाठी आमची संपूर्ण तयारी आहे. राज ठाकरे ज्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये येतील त्या दिवसाची वाट उत्तर भारतीयांचा जनसुमदाय पाहत आहे. माझ्या हातातील धर्मदंड देशद्रोहींना सुधारेल आणि देशप्रेमींचे संरक्षण करेल. आमच्याकडे त्यासाठीच धर्मदंड असतो, असेही या महंतांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे याआधी आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालमध्ये हे महंत घुसले होते. हा ताजमहाल नसून तेजोमहल असल्याचा त्यांचा दावा आहे. ते यावर बोलताना म्हणाले, आग्रा येथील ताजमहाल आमचा तेजोमहल असून ते प्राचीन शिवमंदीर आहे. त्या प्रकरणात रीट पिटीशन दाखल करण्यात आली आहे. लवकरच तेथे पुजा सुरू करण्यात येईल. 40 हजार मंदिरे मुघल आक्रमकांनी तोडली होती, ती सर्व पुढील 3-4 वर्षात रिकामी करण्यात येतील.