पुण्यातील कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा


पुणे – आता टाळ-मृदंगाच्या तालावर राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे कैदी अभंग आणि भजन गायन करणार आहेत. कारागृहांत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धेचे आयोजन कैद्यांमधील कलागुणांना वाव मिळावाआणि त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावा, तसेच थोडा विरंगुळा मिळावा, म्हणून करण्यात आले आहे. 1 ते 30 जून या कालावधीत शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ही स्पर्धा पार पडणार आहे.

कारागृहातील कैद्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून आयोजित या स्पर्धेत 27 संघ सहभागी होणार आहेत. गृह विभागाने एका अध्यादेशाद्वारे कारागृहातील कैद्यांसाठी ही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. ही स्पर्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि तुरुंग महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने घेतली जात आहे.

संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब मोरे-देहूकर, डॉ. रामचंद्र देखणे, नितीन महाराज मोरे आणि योगेश देसाई यांचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या आयोजनासाठी लाभले आहे. कैद्यांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा देशातच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोमवारी सांगितले. या स्पर्धेसाठी येरवडा कारागृहातील कैद्यांना प्रसिद्ध गायक रघुनाथ खंडाळकर प्रशिक्षण देत आहेत.

कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ दीना आणि प्रकाश धारिवाल यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना संवादिनी, तबला, पखवाज, सहा जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची फ्रेम आणि प्रेरणायादी शंभर पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.