अमित शहांची मोठी घोषणाः कोरोना संपताच लागू होणार CAA, म्हणाले ममतांना करायची आहे घुसखोरी


कोलकाता – गृहमंत्री अमित शहा यांनी पं. बंगालमध्ये रॅली काढून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. सिलीगुडीच्या सभेत अमित शहा म्हणाले की, बंगालच्या जनतेने सीएम ममता बॅनर्जी यांना तिसऱ्यांदा जनादेश दिला, आम्हाला वाटले की दीदी बऱ्या होतील. पण, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ममता दीदींनी असा विचार करू नये की भाजप कारवाई करणार नाही.

बीरभूमला का पाठवले नाही शिष्टमंडळ ?
शहा म्हणाले, देशभरात जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा त्या शिष्टमंडळ पाठवतात, मात्र त्यांनी बीरभूमला शिष्टमंडळ का पाठवले नाही, जिथे 8 महिला आणि एका मुलाला जिवंत जाळण्यात आले, ते त्यांचे लोक नाहीत का?

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, टीएमसी CAA बद्दल अफवा पसरवत आहे की त्याची अंमलबजावणी होणार नाही, परंतु मी सांगू इच्छितो की कोविड 19 ची लाट संपताच आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA एक सत्य आहे आणि ते राहिल.

अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे आहे आमचे ध्येय
त्याचवेळी हरिदासपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अमित शहा यांनी देशाची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचे सांगितले. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ उद्दिष्ट असल्याचे शहा म्हणाले. आम्ही आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. आज सतलज, कावेरी आणि नर्मदा फ्लोटिंग बीओपी राष्ट्राला समर्पित आहेत.

शहा म्हणाले, सीमाभागात तैनात असलेल्या आपल्या सैनिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.