राज यांच्या माध्यमातून भाजप काढणार उद्धव यांचा काटा, मनसेसोबत युतीवर एकमत, १४ जूनला होऊ शकते घोषणा


मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) वापर करण्याची तयारी केली आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्याची घोषणा 14 जून रोजी होऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही युतीला ग्रीन सिग्नल दिला आहे. युतीबाबतचे सर्व अडथळे दूर झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबई आणि पुण्यात भाजप मनसेला काही जागा देणार आहे. उर्वरित राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. या संदर्भात शेवटची महत्त्वाची बैठक 21 एप्रिल रोजी झाली होती. यामध्ये संघाचे लोकही उपस्थित होते. या बैठकीत युतीबाबत तत्वत: सहमती झाली. जागावाटपासह इतर काही प्रश्नांवर नंतर निर्णय घेतला जाईल. त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये आणखी काही बैठका होणार आहेत.

सध्या महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. त्यावर टीका करताना राज यांनी यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयासह राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले आहे.

मनसे प्रमुखांनी यासदंर्भात ट्विट केले की, धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींवरुन लाऊडस्पीकर काढून टाकल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन करतो. त्याच्या निर्णयात मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात एकही योगी नाही. आपल्याकडे फक्त सत्ताधारी आहेत. मी त्यांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो.

दरम्यान राज्यात भाजपला मोठ्या भावाची भूमिका करायची आहे, जी शिवसेनेला मान्य नाही. कडवट-मवाळ नातेसंबंधात दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत युती केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्र होते. पण, निकाल आल्यानंतर शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम राहिली आणि नंतर युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्री म्हणून या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.