पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात चुकून जमा झाले तब्बल ४३५० कोटी


नवी दिल्ली : अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे वळते झाले आहेत, या योजनेसाठी जे अपात्र आहेत. आता अशा सर्व शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मदत मिळणार यासंबंधी केंद्र सरकारने काही नियम आखले आहेत. दरम्यान पीटीआयच्या एका वृत्तानुसार, यानंतरही जवळपास ४३५० कोटी रुपये अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. यामध्ये असे अनेक शेतकरीदेखील आहेत, जे आयकर भरतात आणि सोबतच सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात.

फेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. सर्व शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. २००० प्रमाणे तीन हफ्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश मार्गदर्शक तत्त्वांनुसार आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची यादी तयार करतात. शेतकरी कुटुंब म्हणजे यामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. जास्त उत्पन्न असलेल्या शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतात. दरम्यान पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (https://pmkisan.gov.in/) जाऊन अपात्र शेतकरी ‘रिफंड पर्याय’ वर क्लिक करून त्यांच्या खात्यातील रक्कम परत करू शकतात.