बॉलीवूडच्या ११० वर्षाच्या इतिहासात कपूर खानदानाचे ९४ वर्षे योगदान

बॉलीवूड मध्ये अनेक खानदान अनेक कारणांनी चर्चेत असतात. त्यातील एक बडे नाव म्हणजे कपूर खानदान. आज या कुटुंबात रणबीर आणि आलीया भट्ट यांचा विवाह होत आहे. हिंदी चित्रपटाच्या ११० वर्षाच्या इतिहासात कपूर खानदानाचे योगदान तब्बल ९४ वर्षांचे आहे याची अनेकांना कल्पना नसेल. १९२८ पासून हा सिलसिला सुरु झाला तो आजतागायत सुरूच आहे. हिंदी चित्रपट दुनियेत असा कोणताही काळ नाही, ज्यात कपूर कुटुंबातील कुणी सक्रीय नाही. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास रणबीर कपूर पर्यंत विना खंड सुरु राहिला आहे.

कपूर कुटुंब मुळचे पेशावरचे. त्यावेळी भारताची फाळणी झाली नव्हती. पृथ्वीराज यांनी अभिनयाची सुरवात वयाच्या ८ व्या वर्षी केली होती. कॉलेज मध्ये त्यांनी नाटकात स्त्री भूमिका साकारली होती. पण ते शिकलेसवरलेले असल्याचे त्यांना नाटक मंडळीत प्रवेश मिळाला नव्हता असे सांगतात. त्यांनी ८ मूक चित्रपट केले आणि बोलक्या चित्रपटात तर ते सुपरस्टार होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी त्यांच्यापेक्षा दोन वर्षे मोठ्या असलेल्या रामरसनी यांच्याबरोबर विवाह केला. त्यांना एकूण सहा मुले झाली त्यातील दोन मुली अकाली मरण पावल्या आणि राज, शम्मी, शशी आणि उर्मिला ही मुले जगली.

१९९४ मध्ये त्यांनी पृथ्वी थियेटरची स्थापना मुंबईत केली आणि १६ वर्षात येथे २६६२ प्रयोग केले गेले. राजकपूर यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मध्ये वडिलांचा वारसा पुढे नेला. त्यानी एक से एक चित्रपट दिलेच पण सिनेमाला उद्योग असा दर्जा मिळवून दिला. त्यांची मुले रणधीर, ऋषी आणि राजीव.. राज कपूर यांना दोन मुली आहेत. रणधीर, ऋषी यांनी चित्रपटात चांगले यश मिळविले. त्यांच्या पत्नी अनुक्रमाने बबिता आणि नीतू सिंग त्यांच्या काळातील आघाडीच्या नायिका राहिल्या आहेत.

शम्मी आणि शशी कपूर यांनीही अभिनयात चांगले नाव कमावले. रणधीरकपूर यांच्या दोन मुली करिश्मा आणि करीना आज आघाडीच्या नायिका मानल्या जातात तर ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर चित्रपटात चांगला स्थिरावला आहे. त्याची बहिण रीधिमा उद्योजक आहे.