लिंबाच्या किंमती गगणाला भिडल्या; 10 ते 12 रुपयांना एक लिंबू


पुणे – महाराष्ट्रासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. अंगाची कडाक्याच्या उन्हामुळे लाही लाही होत आहे. उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी अनेकचा कल लिंबू पाण्याकडे गेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लिंबाची मागणी वाढली आहे. पण एकीकडे लिंबाची मागणी वाढली असतानाच दुसरीकडे मात्र उत्पादन घटल्याचे चित्र आहे. कारण, मध्येच आलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी मागणी वाढल्यामुळे लिंबाच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

उष्णतेची देशात सध्या सुरु असलेली लाट आणखी दोन महिने राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अंगाची लाही लाही होणार एवढे मात्र नक्की. मोठ्या प्रमाणात लिंबाची मागणी वाढली आहे. परिणामी किंमतीही गगणाला भिडल्या आहेत. एका लिंबाची पुण्यातील घाऊक मार्केटमध्ये तब्बल पाच रुपये एवढी झाली आहे. तर किरकोळ मार्केटमध्ये हे लिंबू दहा ते 12 रुपयांना विकले जाते. पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे महिनाभरापूर्वी विक्री होणा-या लिंबाच्या किंमतीत या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे

मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या मार्केटमध्ये महाराष्ट्रातून लिंबू पाठवले जातात. सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे आंध्र प्रदेश राज्य आहे, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा यांचा क्रमांक लागतो. मार्केटमध्ये येणाऱ्या लिंबाची आयात तब्बल 60 टक्केंनी घटल्याचे पुणे मार्केटमधील दलालांनी सांगितले. गुरुवारी भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, किमान पुढील पाच दिवस तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. तापमानात वाढ होणारच असल्यामुळे अंगाची लाही लाही होणार आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे फळधारणाच झाली नाही. ऐन उत्पादन पदरी पडणार तेवढ्यात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला. आतापर्यंत द्राक्ष, आंबा आणि आता लिंबूचे नुकसान सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयोग फोल ठरत आहेत. ढगाळ वातावरणामुळे फळधारणाच झाली नाही. परिणामी उत्पादन हे निम्म्यावर आले आहे.