मुंबई – शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे दिल्लीत होते. संजय राऊतांच्या मालमत्तांवर याचदरम्यान ईडीने टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. बुधवारी खुद्द शरद पवारांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर आता संजय राऊतांनी मुंबईत येताच भाजपला आव्हान दिले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी विमानतळावर संजय राऊतांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
आमचे तुम्ही काय करणार? भाजप आमच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे २५ वर्ष तुमचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही, याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे. राजकीय विरोधक विचाराने सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्यावरून यावेळी तीव्र शब्दांत टीका केली. भाजपच्या नेत्यांकडून आयएनएस विक्रांतचा घोटाळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आज महाराष्ट्रात गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले. हा संताप आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले केले जात आहेत. ही नमर्दानगी आहे. याविरुद्ध हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावले पडतील, तशी आमची पावले पडतील, असे राऊत म्हणाले आहेत.
आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या बाजूने भाजपचे लोक उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असे देखील राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांकडे या आरोपांचे उत्तर असू शकत नाही. मी पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. राज्यसभेत त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे की घोटाळा झाला आहे, असे देखील राऊतांनी नमूद केले.